लखनौ- दिल्लीतील सत्तेसाठी सर्वात महत्त्वाचं राज्य समजलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही विधानसभा निवडणूक 2024 मध्ये होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जाते. मात्र या महत्त्वपूर्ण निवडणुकीपूर्वीच भाजपला गळती लागल्याचं चित्र आहे. कॅबिनेटमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी राजीनामा देत भाजपला अलविदा केला. तोच आज मौर्य यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालं आहे.
मौर्य यांनी भाजप सोडताच 2014 मध्ये त्यांनी केलेल्या एका भाषणातील विधानांवरून देवदेवतांचा अपमान झाल्याचे सांगून आता त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या अटक वॉरंटनुसार मौर्य बुधवारी न्यायालयात हजर झाले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे.
14 जानेवारी रोजी मौर्य समाजवादी पक्षात अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर आणखी चार आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. याआधी भाजप सोडणाऱ्या अनेक नेत्यांना ईडी, सीबीआयची नोटीस मिळालेली आहे. त्यातच मौर्य यांनाही नोटीस आली आहे. तर आपण भाजप सोडण्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.