मुंबई – निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकांची घोषणा देखील करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठे उलटफेर होताना दिसतायेत. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजपला निवडणुकांच्या तोंडावरच दोन मोठे धक्के आहेत. योगी यांच्या मंत्रिमंडळातील स्वामी प्रवाद मौर्य व दारा सिंह चौहान या दोन मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
हे दोन्ही नेते ओबीसी समाजातील असून त्यांच्यापाठोपाठ त्यांचे समर्थक आमदार देखील भाजपला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील आहे. एकेकाळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने उत्तर प्रदेशातील घडामोडींवरून निशाणा साधला आहे.
योगींच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून हे राजीनामापत्र ट्विट करत, ‘उत्तर प्रदेश… बदलाच्या दिशेने’ असा संदेश दिला आहे. यापूर्वी, राऊत यांनी मंगळवारी ‘गोवा व उत्तर प्रदेशात १०० टक्के बदल होणार आहे ‘ असं विधान केलं होत. अशातच आज योगींच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर राऊत यांनी पुन्हा निशाणा साधला आहे.
शरद पवार यांचेही भाकीत
उत्तर प्रदेशातील जनतेला बदल हवा असून निवडणुकांनंतर राज्यात बदल झाल्याचे पाहायला मिळेल असे शरद पवार यांनी मंगळवारी मुंबई येथे बोलताना सांगितलेत. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासोबत निवडणूक लढवणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
भाजपला २४ तासांच्या आत दुसरा धक्का
दरम्यान, उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपला २४ तासांच्या आत दुसरा धक्का बसला आहे. कॅबिनेटमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर योगी सरकारमधील आणखी एक मंत्री आणि ओबीसी नेते दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे. मागील २४ तासांत भाजपमधील आतापर्यंत ६ नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
दारा सिंह चौहान समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. केवळ दोन दिवसांत दोन मंत्री आणि चार आमदारांनी पक्ष सोडल्याने निवडणूक भाजपसाठी खडतर होत चालली आहे.