अलाहाबाद – मेळावे, सभा आणि निवडणुका थांबवण्याचा आणि पुढे ढकलण्याच गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्याकडे लक्ष वेधले. एका फौजदारी खटल्यातील आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायाधीशांनी हे मत व्यक्त केले.
न्या. शेखर कुमार यादव यांनीही अलाहाबाद न्यायालयाच्या रजिस्टारना या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नियम बनवण्याचे आदेश दिले. आज पुन्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष लाखांचे मेळावे आणि सभा घेत आहेत. या कार्यक्रमात करोना आचारसंहिता पाळणे शक्यच नाही. हे वेळीच थांबवले नाही तर दुसऱ्या लाटेपेक्षा परिस्थिती भयावह बनू शकते, असे न्या. यादव म्हणाले.
जर जीवन राहिले तरच निवडणुका घेता येतील असे सांगून या निवडणुका एक किंवा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयाने केली. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला करोना मुक्त लसीकरण करण्यास आपल्या सन्माननीय पंतप्रधानांनी सुरुवात केली आहे. हे कौतुकास्पद आहे. हे न्यायालय त्याचे कौतुकही करत आहे. सध्याच्या भीतिदायक परिस्थितीत आमची सन्माननीय पंतप्रधानांना विनंती आहे, त्यांनी निवडणुका स्थगित करून पुढे ढकलण्यासाठी उपाययोजना करावी… जान है तो जहॉं है, असे न्या. यादव म्हणाले.