नवी दिल्ली – ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली धर्मांतर करू नये. शिक्षण आणि अन्य सेवांच्या नावाखाली व्यापार केला जात आहे. आपली संस्कृती ही भारताची जमेची बाजू आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीवर आघात करुन नियोजनबद्ध रितीने धर्मांतर केले जात आहे. धर्मांतर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. जिथे जिथे हिंदूंचे धर्मांतर झाले, तो भाग अस्थिर झाला, याला इतिहास साक्षी आहे.
आज देशातील अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा लागू केला असला, तरी हा कायदा देशभर लागू करुन त्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी देशभरातील हिंदूंनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन भाजपचे छत्तीसगड प्रदेशमंत्री प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मांतर हेच राष्ट्रांतरया विषयावरील विशेष संवादात बोलत होते.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बन्सल म्हणाले की, धर्मांतर हेच राष्ट्रांतर याविषयी कुठलीही शंका असता कामा नये. अखंड भारतापासून अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश हे धर्माच्या आधारावरच वेगळे झाले. जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या घटली, तिथे धर्मांतर झाले आहे.
काश्मीर, बंगाल, केरळ, ईशान्य भारतातील राज्ये ही याची उदाहरणे असून तिथे आतंकवादी कारवाया, जिहादी आक्रमणांत वाढ झाली आणि तेथील हिंदू अल्पसंख्य झाले. धर्मांतर रोखण्यासाठी अनेक साधू-संतांनी बलीदान दिले आहे. ओडिशा येथील स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांनी धर्मांतर रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या घरवापसीसाठी महान कार्य करत आपल्या प्राणांचे बलीदान दिले. धर्मांतर थांबवणे खूप आवश्यक आहे.
हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राज्यस्थान समन्वयक आनंद जाखोटिया म्हणाले की, जेव्हा एका व्यक्तीचे धर्मपरिवर्तन होते, तेव्हा फक्त त्याचे धर्मपरिवर्तन होत नसून आपल्या धर्माच्या विरोधात एक शत्रू म्हणून तो उभा राहतो, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते. पूर्वी अखंड असलेला भारत आता विभागला गेला आहे.
देशातील 9 राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. धर्मांतराच्या समस्येने आता व्यापक रूप धारण केले आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जात आहे. देशभर धर्मांतरविरोधी कायदा अशा कठोर पद्धतीने लागू करायला हवा की, धर्मांतर करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. धर्मांतरविरोधी कायदा ही काळाची आवश्यकता आहे.