नवी दिल्ली – फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर सुखाचा संसार मोडून पाकिस्तानमध्ये निघून गेलेली 34 वर्षीय अंजू (Anju in pakistan) आता भारतात परत येणार आहे. पाकिस्तान सरकारने तिला भारतात जाण्याला अनुमती दिल्यानंतर ती भारतात येणार आहे, असे तिच्या पतीने म्हटले आहे. ऑगस्टमध्ये पाकिस्तानने अंजूचा व्हिसा एक वर्षाने वाढवला होता, तिने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर आणि नसरुल्लाहशी लग्न केल्यानंतर तिचे नाव फातिमा ठेवण्यात आले होते.
“आम्ही पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्राची वाट पाहत आहोत. त्यासाठी आम्ही आधीच अर्ज केला आहे. “एनओसी’ प्रक्रिया थोडी लांबली आहे आणि ती पूर्ण होण्यास आणखीन थोडा वेळ लागतो आहे.’असे अंजूच्या पाकिस्तानी पतीने पीटीआयला सांगितले,
वाघा बॉर्डरवर (Wagha Border) येण्या-जाण्याची कागदपत्रे पूर्ण होताच अंजू भारतात जाईल. बारतात असलेल्या मुलांना बेटल्यानंतर ती पुन्हा पाकिस्तानला येईल, असे त्याने सांगितले. आता पाकिस्तान हेच तिचे घर असल्यामुळे ती नक्कीच आपल्याकडे परत येईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
अंजूला आपल्या दोन्ही मुलांची आठवण येते आहे. त्यामुले ती खूप अस्वस्थ आहे, असे नसरुल्लाह गेल्या महिन्यात म्हणाला होता. 25 जुलै रोजी अंजूने तिचा 29 वर्षीय मित्र नसरुल्लासोबत निकाह केला, त्याचे घर खैबर पख्तूनख्वाच्या अप्पर दीर जिल्ह्यात आहे. 2019 मध्ये त्यांची फेसबुकवर मैत्री झाली होती. अंजूचे आधी राजस्थानमध्ये राहणाऱ्या अरविंदसोबत लग्न झाले होते. त्यांना 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे.