राजेंद्र वाघमारे
नेवासा – सफरचंद या पिकाची लागवड फक्त थंड प्रदेशात केली जाते. जेथे पर्वतांची उंची सुमारे सोळाशे ते सत्तावीशे मीटर आहे. याशिवाय शंभर ते दीडशे सेंटीमीटर पाऊस असलेले क्षेत्र सफरचंद लागवडीसाठी सर्वोत्तम मानले जाते. आता मात्र सुधारित वाणाच्या आधारे सफरचंद लागवड कुठेही सहज करता येऊ शकते. तालुक्यातील रामडोह येथे प्रगतशिल शेतकरी भारत गुंजाळ यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये सफरचंद लागवड करून ही किमया साध्य केली आहे.
रामडोह येथील जायकवाडी जलाशयाजवळ असलेल्या शेतीमध्ये भारत गुंजाळ यांनी प्रायोगिक तत्वावर एक एकर सफरचंद फळाची बाग लागवड केलेली आहे. आता ही झाडे 27 महिन्यांचे झालेले आहेत. या सफरचंदच्या झाडांना फळे देखील येऊ लागले आहेत. पाखरांनी फळांचे नुकसान करू नये म्हणून झाडाला लागलेल्या सफरचंदच्या जुडग्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे आवरण लावण्याचे काम शेती कामगार महिलांकडून सुरू आहे.
या सफरचंदच्या बागेला दैनिक प्रभात टीमचे वृत्तसंपादक जयंत कुलकर्णी, जाहिरात व्यवस्थापक संदीप देसाई, संतोष साळवे, दिनेश माने, नेवासा तालुका प्रतिनिधी राजेंद्र वाघमारे यांनी रामडोह येथील जायकवाडी जलाशयाजवळ असलेल्या निसर्गरम्य वातावरणात सफरचंद व सीताफळ बागेला भेट दिली. प्रगतशील शेतकरी भारत गुंजाळ यांच्याशी विस्तृत चर्चा केली.
गुंजाळ यांनी सांगितले की, आम्ही सफरचंदाचे रोपटे तीन महिन्यांचे असताना हिमाचल प्रदेश येथून आणून रामडोह येथे लागवड केली. सफरचंद लावणीनंतर 2 ते 3 वर्षांत या रोपट्याला फळे येण्यास सुरुवात झालेली आहे. या बागेत लावलेले सफरचंद हे दर्जेदार आणि चवीनुसार उत्कृष्ट असल्याचे सांगितले. त्यामुळे गुंजाळ यांची सफरचंद बाग ही सध्या नगर जिल्ह्यात कुतूहलाचा विषय ठरताना दिसून येत आहे.