अरुण गोखले
घराचं मंदिर आणि त्या मंदिरातील मात्यापित्याच्या रूपाने असणाऱ्या देवांची जेव्हा पुंडलिकाने सेवा, भक्ती, पूजा केली तेव्हा न बोलावता आपल्या प्रपंच्यात परमार्थ आणून घराचं देऊळ केलेल्या त्या मातृपितृभक्ताचा दारात देव स्वत: आले.
पुंडलिकाने आपल्या वृद्ध माता-पित्यांना पायी काशी यात्रेला पाठविले आणि तो मात्र स्वत: बायकोला घोड्यावर बसवून घेऊन काही दिवसांनी त्याच यात्रेस गेला. प्रवासात यात्रेकरू वाट चुकले आणि ते कुक्कुटस्वामीच्या आश्रमात आले.
तेथील मुक्कामात पुंडलिकाने तीन दिवस रोज पहाटे तीन दिव्य स्त्रियांना स्वामींच्या आश्रमात झाडलोट करताना, पाणी भरताना इत्यादी कामे करताना पाहिले. पुंडलिकाने त्यांना तुम्ही कोण? तुम्ही या आश्रमात काय करता? असे विचारले. तेव्हा त्या तिघींनी पुंडलिकाला आपली नावे सांगितली. त्या तिघी म्हणजे गंगा-यमुना-सरस्वती. या तीन नद्या आहेत. त्या स्वत: शुद्ध निर्मळ होण्यासाठी मातृपितृभक्त कुक्कुटस्वामीच्या दर्शनाला तिथे येतात आणि पवित्र होतात, असे त्यास सांगितले.
पुंडलिकाने त्या कुक्कुटस्वामींना आपल्या माता-पित्यांची सेवा करताना पाहिले तेव्हा त्यास त्याचे महत्त्व लक्षात आले. त्या तिन्ही जलदेवतांकडून आईवडिलांच्या सेवेची महती समजल्यावर पुंडलिकाला तो त्याच्या आईवडिलांचा करीत असलेला अनादर, त्यांची केलेली उपेक्षा याचे फार वाईट वाटले. त्याच्या मनास उपरती झाली. त्याने त्वरित यात्रेत माता-पित्याचा शोध घेतला. त्यांना घरी आणून तो त्यांची निरंतर सेवा करू लागला.
एक दिवस पुंडलिक आपल्या माता-पित्यांची चरणसेवा करत असताना, स्वत: देव त्याला दर्शन द्यायला आले. देव जेव्हा पुंडलिकाच्या दारात आले त्यावेळी तो आपल्या आईवडिलांचे पाय चेपीत होता. एकीकडे हाताने सेवेचे काम तर दुसरीकडे मुखाने देवाचे नाम अशी त्याची साधना चालू होती.
त्यावर पुंडलिक म्हणाला, “”देवा तू माझ्या दारी आला आहेस हे खरं; पण आता मी माझ्या माता-पित्याची सेवा करतो आहे. त्यांची चरणसेवा अर्धवटसोडून मी तुझ्या दर्शनाला तरी कसा येऊ? तू असं कर की तू या विटेवर उभा राहा”. असं म्हणत तिथेच पाय घासायची जी एक वीट होती ती पुंडलिकाने देवापुढे भिरकवली. दारी आलेले देव तेव्हापासून विटेवर उभे आहेत.