Amol Mitkari Post : आज दुपारी २ वाजता राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवरून भावूक ट्वीट केले आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अजितदादा विना आहे. अजितदादांची उणीव संपूर्ण राज्याला जाणवेल अशा शब्दांत अमोल मिकटरी यांनी ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत. नेमंक काय म्हणाले मिटकरी? “उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल, पण यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अजितदादा विना आहे. वर्षानुवर्षे ज्यांच्या अभ्यासू आणि ठाम नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जायचा, त्या अजितदादांची उणीव उद्या संपूर्ण राज्याला जाणवेल. कागदावर आकडे असतील, योजना असतील; पण दादांची दृष्टी, धडाडी आणि अनुभव यांची कमतरता मात्र उद्या दिसणार नाही. दादा विना अर्थ नसलेला अर्थसंकल्प” अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल, पण यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अजितदादा विना आहे. वर्षानुवर्षे ज्यांच्या अभ्यासू आणि ठाम नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जायचा, त्या अजितदादांची उणीव उद्या संपूर्ण राज्याला जाणवेल. कागदावर आकडे असतील, योजना असतील; पण दादांची… pic.twitter.com/s28GZnzTKM — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 5, 2026 अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्राचे लक्ष सध्या महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन सुरू असून, ६ मार्च म्हणजे आज राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत. कालबाह्य योजना बंद करणे किंवा त्यात काळानुरूप बदल करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडताना करतील, अशी शक्यता आहे. याशिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ १५०० रुपये वरुन २१०० होणार का? शेतकरी कर्जमाफीचा निर्णय, यासोबतच पायाभूत सुविधा, सिंचनाची कामे अशा कोणत्या घोषणा केल्या जातील हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळणार याकडे विशेष लक्ष आहे. आर्थिक पाहणी अहवालात काय? अर्थसंकल्पाच्या आदल्यादिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. आगामी वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज राष्ट्रीय सरासरीपेक्षा म्हणजे ७.४ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त आहे. तसेच आर्थिक सर्वेक्षण अहवालात राज्यावरील कर्जाचा बोजा मार्चअखेरीस ९ लाख ३२ हजार कोटींवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महसुली जमेपेक्षा खर्च अधिक असल्याने महसुली तूट अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रमी वाढ अपेक्षित असून मार्च २०२६ अखेर राज्यावरील कर्जाचा बोजा ९ लाख ३२ हजार २४२ हजार कोटीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. मार्च, २०२५ अखेर कर्जाचा आकडा ८ लाख ३९ हजार २७५ कोटी रुपये इतका होता. हेही वाचा : Vijay Thalapathy and Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेत विजय थलपती पुन्हा तृषा कृष्णनसोबत दिसले; दोघे एकत्र कार्यक्रमात सहभागी