रायगड – रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच कोटयवधी रुपये खर्च करून या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पुलाचे खांब धोकादायक असल्याची बाब समोर आल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीतील दापोली, मंडणगड व खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आंबेत पूल धोकादायक बनल्याने दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. जवळपास बारा कोटी रुपये खर्चून या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. यासाठी जवळपास वर्षभर वाहतुक बंद ठेवण्यात आली होती.
दुरुस्तीनंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा पूलाचे काही खांब पश्चिम दिशेला झुकले असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.