अमरनाथ गुहेच्या काही किलोमीटर आधी शुक्रवारी 8 जुलै रोजी संध्याकाळी अचानक ढगफुटी झाली. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. भारतीय लष्कराच्या नेतृत्वाखाली NDRF, SDRF आणि ITBP च्या टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने लोक अस्वस्थ झाले आहेत. या घटनेवर शोक व्यक्त करत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करून लोकांसाठी प्रार्थना केली आहे.
अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी IMD हवामानाबाबत विशेष सूचना जारी करते. शुक्रवारी IMD ने यलो अलर्ट जारी केला होता. अमरनाथ यात्रेच्या वेबसाइटवर संध्याकाळी 4.07 पर्यंत हवामान अंदाजानुसार, पहलगाम आणि बालटाल या दोन्ही बाजूच्या मार्गांसाठी अंशत: ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
अमरनाथमधील या दुःखद घटनेनंतर बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.’बालटालमध्ये अमरनाथ मंदिरातील पवित्र गुहेजवळ ढगफुटीनंतर झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले. सर्वांच्या शांती आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना. अशा आशयासह हात जोडणाऱ्या इमोजीचे अक्षयने ट्विट केले आहे.
सर्वत्र भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली जात आहे. देशभरातील लोक भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना करत आहेत. अमरनाथ यात्रेदरम्यान नैसर्गिक आपत्तीच्या घटना समोर आल्या आहेत. पहिला मोठा अपघात 1969 साली झाला. जुलै १९६९ मध्ये अमरनाथ यात्रा मार्गावर ढगफुटीची घटना घडली होती.