आळंदी – करोना या जागतिक महामारीच्या गंभीर संकटा मुळे सन २०२०/२१ ही दोन वर्ष भीती आणि काळजी यांच्या गडद छायेखाली जात आहेत. त्यामुळे ७०० वर्षांची पायी वारीची परंपरा लागोपाठ दुसऱ्यांदा खंडित झाली. शंभर वर्षांपूर्वी उद्भवलेल्या स्पॅनिश फ्लूच्या जागतिक संकटानंतर निसर्गाने मानवाला पुन्हा एकदा धोक्याचा कंदील दाखवला आहे.
मानव विविध क्षेत्रांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची नेत्रदीपक प्रगती करत असताना मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडुन जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला, मात्र परतफेड करण्याचे मात्र तो साफ विसरला. एखाद्या व्यक्तीकडून व समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रती नेहमी कृतज्ञ राहतो. कधीही कृतघ्न होत नाही हा आपला शिष्टाचार आहे. परंतु हा शिष्टाचारच मानवाने पर्यावरणाप्रति कधीच पाळला नाही व त्या निष्क्रियतेचीच कडू फळे आज आपनाला चाखायला लागत आहेत. आणि येथून पुढे जर पर्यावरणाकडे आपण दुर्लक्ष केलं तर पृथ्वीचा सर्वनाश अटळ आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनासाठी पर्यावरण पूरक काम करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
याच जाणिवेतून पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा म्हणून “हरीत वारी २०२१” अंतर्गत ज्येष्ठ वद्य सप्तमी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान दिवशी देहू येथे वृक्षलागवडीचा प्रारंभ करून माऊलींच्या व तुकोबारायांच्या प्रत्येक पालखी मुक्कामाच्या गावात प्रत्येकी दहा देशी वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. हरित वारी म्हणजे, संतांच्या पालखी महामार्गाच्या दुतर्फा देशी वृक्ष लागवड करून संत विचारांचे मार्ग हरित करणे.
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी परतीला अर्थात मंगळवार दि ३ ऑगस्ट २०२१, आषाढ वद्य १०, शके १९४३ या दिवशी श्री संत ज्ञानेश्वर बाग येथील गोशाळेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते १३ कदंब वृक्ष लाऊन हरित वारी २०२१ या अभियानाची सांगता करण्यात लावण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, उप महापौर नाणी घुले, नगरसेवक नामदेव ढाके व सचिन चिखले, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्थ अभयजी टिळक, विश्वस्थ लक्ष्मीकांत देशमुख, व्यवस्थापक माऊली वीर, पंढरपुर मंदिर समितीच्या सदस्या ऍड माधवी निगडे, सदस्य हभप शिवाजी महाराज मोरे, प्रफुल्ल अप्पा जोशी, आळंदी नगर अध्यक्षा नांदेडकर, संजय घुंडरे, हभप रविदास महाराज शिरसाठ, हभप श्रीहरी रेड्डी महाराज, हभप कैलास महाराज ढगे, वारकरी शिक्षण संस्थेचे तुकाराम महाराज मुळीक, हभप उमेश महाराज बागडे व अळंदीतील अनेक नागरिक उपस्थित होते.