नवी दिल्ली – अजमेरच्या टाडा न्यायालयाने सीरियल बॉम्बस्फोट प्रकरणातून दहशतवादी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता केली आहे. तर इरफान आणि हमीमुद्दीन दोषी आढळले आहेत. सीरियल बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल ३० वर्षांनंतर कोर्टाने निकाल दिला आहे. शेकडो साक्षीदार, पुरावे आणि अनेक वर्षांच्या चर्चेनंतर अजमेरच्या टाडा न्यायालयाचे न्यायाधीश महावीर प्रसाद गुप्ता यांनी आपला निकाल देताना दहशतवादी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता केली.
अब्दुल करीम टुंडाचे वकील शफकत सुलतानी यांनी सांगितले की, न्यायालयाने सीबीआय न्यायालयाने केलेले आरोप मान्य केले नाहीत आणि करीमची निर्दोष मुक्तता केली. त्याचबरोबर अन्य दोन आरोपी इरफान आणि हमीमुद्दीन यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बॉम्बस्फोट मालिकेतील आजच्या निर्णयाबाबत सकाळपासूनच खळबळ उडाली होती. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांचे पथक करीम टुंडा, हमीदुद्दीन आणि इरफान या दहशतवाद्यांसह टाडा न्यायालयात पोहोचले. दहशतवाद्यांच्या सुरक्षेसाठी टाडा न्यायालयाबाहेरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
६ डिसेंबर १९९३ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर कोटा, लखनौ, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि मुंबईच्या गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले. या प्रकरणी २८ फेब्रुवारी २००४ रोजी टाडा न्यायालयाने १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. जयपूर तुरुंगात असलेल्या उर्वरित आरोपींची शिक्षा कायम ठेवली होती.
टाडा न्यायालयाचे न्यायाधीश महावीर प्रसाद गुप्ता यांनी अब्दुल करीम टुंडा, हमीदुद्दीन आणि इरफान अहमद यांच्या विरोधात निकाल दिला. त्यामध्ये अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हमीदुद्दीन आणि इरफान यांच्यावर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप होता. त्याचवेळी अब्दुल करीम टुंडा हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप होता.