कोपरगाव – जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे कार्य खूप मोठे आहे. “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’ ही त्यांची विचारधारा आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक अध्यात्मिक, सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या सुरू आहेत. हिंदू धर्म, संस्कृती व पर्यावरणाचे संरक्षण करण्याबरोबरच समाजाची मानसिकता बदलून नवी दिशा देण्याचे काम ते करत आहेत. नरेंद्राचार्य महाराजांच्या शिकवणीचे तंतोतंत पालन करण्यावर सर्वांनी भर द्यावा. कारण, त्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
स्व-स्वरूप संप्रदाय उत्तर नगर जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी कोपरगाव येथे श्रीक्षेत्र नाणीज धाम येथील जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी त्यांनी पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. या सोहळ्यात कोल्हे यांच्याहस्ते जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने दुर्बल घटक पुनवर्सन उपक्रमांतर्गत 25 महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी ऊर्फ उंडे महाराज, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, अक्षय काळे, जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे उत्तर महाराष्ट्र पीठ व्यवस्थापक प्रवीण ठाकूर, उपजिल्हाध्यक्ष व निरीक्षक दत्तात्रय उन्हाळे,
जिल्हा सेवा अध्यक्ष सयाजी भडांगे, दहिफळे, दत्तात्रय बारसे, सुरेश चंदनशिव, महेंद्र सिनगर, संदीप दीक्षित, जगन्नाथ बोठे, पादुका व्यवस्थापक रानभरे, मिटकर, नवनाथ गुडघे, अनिल वाघे, संग्राम सेनाप्रमुख अशोक मुसमाडे आदी उपस्थित होते. यावेळी “श्री’ पादुका व गुरुपूजन सोहळा, आरती, प्रवचन, उपासक दीक्षा, पादुका दर्शन, पुष्पवृष्टी आदी कार्यक्रम झाले. महाराजांच्या कार्यावर आधारित चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. संस्थानने माता-भगिनींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आज दुर्बल घटक पुनवर्सन उपक्रमांतर्गत 25 मोफत शिलाई मशीनचे वाटप करून स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
कोल्हे म्हणाले, जीवनात आपल्याला अनेकदा त्याग करावा लागतो. त्यामुळे उपासकांनी वाईट गोष्टींचा त्याग करून नरेंद्राचार्यांची शिकवण आचरणात आणली तर त्यांच्या जीवनात समृद्धीची नवी पहाट उगवणार आहे. यापुढील काळात या उपासकांची पावले सरळ दिशेने पडत राहतील, अशी मला खात्री आहे. भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्याला कारण आपल्या देशातील संतपरंपरा आहे. महाराजांसारख्या संतांनी आपल्याला समाजासाठी जगायला शिकवले म्हणून आपली संस्कृती टिकून आहे, असेही कोल्हे म्हणाले.