– हिमांशू
अवघ्या नऊ वर्षांचं किंवा तीनच वर्षांचं आयुष्य लाभलेली पोरं मुळात जन्मालाच का आली, हा प्रश्न आहे. मृत्यूही नैसर्गिक नाही; अपघातसुद्धा नाही. एके रात्री आईवडील दोन पोरांना जवळ बोलावतात. चौघांचा एक मस्त, हसरा सेल्फी काढतात. मग त्या कोवळ्या जिवांना कोल्ड्रिंक प्यायला देतात. पोरं आनंदानं ते पितात आणि थोड्या वेळानं निष्प्राण होऊन पडतात. तोपर्यंत त्यांच्या शेजारी बसलेले आईवडील पोरांचा मृत्यू झाल्याची खात्री करून घेतात आणि दुपट्ट्यानं फास लावून घेतात. तत्पूर्वी कुटुंबप्रमुख चौघांचा सेल्फी आपल्या भाचीला पाठवतो आणि कॅप्शन लिहितो… “हा माझा शेवटचा फोटो आहे.’ पहाटे चार वाजता भाची तो फोटो आणि मेसेज पाहते आणि घाबरून तिच्या कुटुंबाला दाखवते. सगळेजण धावतपळत नातेवाईकांच्या घरी पोहोचतात,
त्यावेळी दोन कोवळे जीव अंथरुणावर गप्पगार पडलेले असतात आणि त्यांच्या आईवडिलांचे मृतदेह छताला लटकताना दिसतात. हे हसतं-खेळतं कुटुंब कुणी उद्ध्वस्त केलं? अशी आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्याशी पोहोचली असतील? भोपाळमध्ये घडलेल्या या घटनेच्या काही तास आधी बंगळुरूच्या एका कुटुंबाने तरणाताठा मुलगा गमावला. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या या तरुणाला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीही मिळाली नाही. शिकून-सवरून आईवडिलांचा आधार बनण्यापूर्वीच त्यानं गळफास घेतला. कुणी घेतला त्याचा बळी? या पाचही बळींचे धागे एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ऑनलाइन कर्ज देणारी ऍप्स!
आर्थिक तंगी सुरू असताना गरजू माणसाला कर्ज काढावं लागतं. बॅंकांची प्रक्रिया किचकट असते. नियम, शर्ती, जामीनदारांचा शोध, कागदपत्रांची जुळवाजुळव हे सगळं होईपर्यंत बरेच दिवस जातात. अशा लोकांना गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन कर्ज देणारी ऍप्स आपल्या जाळ्यात ओढत आहेत. ऍप डाउनलोड करत असतानाच मोबाइल गॅलरी, कॉन्टॅक्ट्स, लोकेशन आदींपर्यंत पोहोचण्याची परवानगी संबंधित कंपनीकडून मागितली जाते. गरजू माणसाला फक्त पैसे दिसत असतात. तो पटापट परवानग्या देऊन टाकतो आणि मग सुरू होतो एक भयानक खेळ!
मागितलेल्या कर्जाच्या केवळ साठ-सत्तर टक्के रक्कमच संबंधिताच्या खात्यावर जमा केली जाते. उर्वरित रक्कम सर्व्हिस फी म्हणून आधीच कापली जाते. पाच-सात हजारांपेक्षा जास्त कर्ज या कंपन्या देत नाहीत. शिवाय, व्याजदर इतके प्रचंड आहेत, की पाच हजाराचे पन्नास हजार कधी झाले, हे कर्ज घेणाऱ्याला कळतसुद्धा नाही. दोन-तीनशे टक्क्यांनी व्याज घेणाऱ्या या कंपन्या दरम्यानच्या काळात संबंधिताच्या मोबाइलमध्ये, लॅपटॉपमध्ये घुसखोरी करतात. मालवेअर किंवा थर्ड पार्टी ऍप्स इन्स्टॉल करतात आणि व्यक्तिगत माहिती, फोटो, व्हिडिओ चोरतात. मग फोटो मॉर्फ करून संबंधिताला ब्लॅकमेल करतात.
भोपाळ आणि बंगळुरू, दोन्ही घटनांमध्ये हीच कार्यपद्धती दिसून आली. आणखीही शेकडो प्रकरणांत ती यापूर्वीही दिसली आहे. पण म्हणतात ना, गरजवंताला… भोपाळच्या प्रकरणात लॅपटॉप आणि बंगळुरूच्या प्रकरणात फोन हॅक केला गेला. कर्जदाराच्या फोटोंचं विकृतीकरण करून धमकावलं जाऊ लागलं. जाचाला कंटाळून अनेकजण टोकाचा निर्णय घेतात. यातील बहुतांश कंपन्या चिनी आहेत. असंख्य चिनी ऍप्सवर बंदी असली, तरी ऑनलाइन कर्जवाले जोशात आहेत. त्यांच्यापासून कायमस्वरूपी मुक्ततेसाठी ठोस उपायांची अपेक्षा धोरणकर्त्यांकडून करावी का?