– हिमांशू
राजकीय परिस्थितीचा सुमारे तासभर सर्वांगीण ऊहापोह केल्यानंतर ‘पुरे झाले…’ असं उच्चारलं जातं. असे असंख्य प्रसंग तुम्ही पाहत, अनुभवत असाल. काय कारण असावं त्याचं? आपल्या लोकांना राजकारणात असलेला रस आणि ज्ञान दोन्ही भरभरून असताना असं का होत असावं? सुरुवात कितीही उत्साहानं करा… शेवट अत्यंत निराशाजनक होतो. राजकीय परिस्थिती कशीही असली, तरी ज्यांच्या उत्साहावर बिलकूल परिणाम होत नाही, अशा लोकांसाठी निवडणुका हा खरोखर ‘उत्सव’ आहे. या लोकांना एवढंच माहीत असतं, की जो भारताचा नागरिक आहे, त्या प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मग ती ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची.
त्यामुळे निवडणूक दाराशी येताच हे लोक ङ्गॉर्म वगैरे भरायच्या कामात गुंततात. त्यांच्याकडे ना ङ्गारसा पैसाअडका असतो, ना प्रचारयंत्रणा. तरीही प्रत्येक निवडणूक हिरीरीनं लढवायचीच आहे, हा त्यांचा बाणा असतो. तमिळनाडूतल्या अशा एका विक्रमवीराची कहाणी नुकतीच वाचण्यात आली. हे गृहस्थ ‘इलेक्शन किंग’ म्हणून ओळखले जात असले, तरी के. पद्मराजन असं त्यांचं नाव आहे. टायर दुरुस्तीचं दुकान हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे.
आजमितीस 65 वर्षांचे असलेल्या पद्मराजन यांनी 1988 पासून आतापर्यंत तब्बल 238 वेगवेगळ्या निवडणुका लढवल्यात. धर्मपुरी जिल्ह्यातल्या मतदारसंघातून यावेळीही ते निवडणूक लढवतायत. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राष्ट्रपतिपदापर्यंत सर्व निवडणुका त्यांनी लढवल्यात. पंतप्रधानपद भूषवलेल्या अनेक व्यक्तींच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवलीय. मोठमोठ्या पक्षांच्या अध्यक्षांविरुद्ध शड्डू ठोकलाय. जय-पराजयाची बिलकूल ङ्गिकिर नसलेल्या आणि केवळ लढणं ठाऊक असलेल्या अशा व्यक्तीच उत्साहाची पातळी टिकवून असतात. आपल्याविरुद्ध उमेदवार कोण आहे, याची आपल्याला पर्वा नसते, असं सांगून के. पद्मराजन सगळ्यांनाच थक्क करतात.
लक्षावधी रुपये त्यांनी आतापर्यंत विविध निवडणुकांच्या शुल्कासाठी आणि डिपॉझिटसाठी खर्च केलेत. डिपॉझिट दरवेळी जप्त झालं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु यंदाही त्यांनी 15 हजार रुपये भरलेत, हे आवर्जून सांगितलं पाहिजे. 6 हजार 273 ही आतापर्यंत त्यांना मिळालेली सर्वोच्च मतसंख्या आहे. परंतु त्यावेळीही ते म्हणाले होते, ‘मला एकही मत मिळणार नाही असं वाटलं होतं. पण इतके लोक मला स्वीकारतात, यातच मला आनंद आहे.’ ही खिलाडूवृत्ती पक्षानं तिकीट नाकारल्यामुळे नाराज होणार्या नेत्यांमध्ये कशी सापडणार?
असे छोटे उमेदवार आणि त्यांच्या घोषणा अनेकदा लक्षवेधी असतात.
विदर्भात एका छोट्या पक्षाच्या महिला उमेदवाराने केलेली ‘गाव तिथं बिअर बार’ ही घोषणाही अशीच लक्षवेधी ठरलीये. परिसरात असलेली दारूबंदी रद्द करण्याची मागणीही त्यांनी पूर्वी केली होती. समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणं ही त्यांना ङ्गार मोठी चूक वाटते. बिअर बारचे परवाने युवकांना रोजगार देतील, याची त्यांना खात्री असून, खासदार झाल्यास आनंदाच्या शिध्यासोबत बाटली देण्याची घोषणा त्यांनी केलीये म्हणे! सांगा बरं, कुठाय निरुत्साह?