हिमांशू
झाडाच्या खोडावर घाव घातल्याबरोबर झाड वेदनेनं जोरात ओरडलं असतं; कळवळलं असतं तर..? मानवचलित किंवा यांत्रिक करवत झाडाच्या खोडातून आरपार जात असताना आजूबाजूच्या परिसरात रक्ताच्या चिळकांड्या उडल्या असत्या तर..? आज दिसते तेवढी वृक्षतोड झाली असती का? झाड तोडताना किंवा त्याची पानं, फळं तोडताना त्याला वेदना जाणवतात का, हा बऱ्याच वर्षांपासून संशोधनाचा विषय बनलेला आहे.
काही जणांच्या मते, ज्याप्रमाणे मानव आणि अन्य प्राण्यांमध्ये वेदनांची जाणीव मेंदूपर्यंत पोहोचविणारे मज्जातंतू असतात, तसे झाडांमध्ये नसतात आणि त्यामुळेच त्याला वेदना, संवेदना जाणवत नसाव्यात. काहीजणांच्या मते, झाडांना संवेदना जाणवत असाव्यात; फक्त ते त्या व्यक्त करत नाही. वनस्पती किंवा तिचा कोणताही भाग तोडल्याबरोबर विशिष्ट वायू उत्सर्जित होतात. म्हणूनच कापलेल्या ताज्या गवतातून विशिष्ट गंध येतो.
“केमिकल डिस्ट्रेस कॉल’ हे त्यामागील कारण असतं. ही त्या वनस्पतीनं मदतीसाठी केलेली याचना असते, असं सांगतात. अर्थात, प्राण्यांप्रमाणे वनस्पती इकडेतिकडे जाऊ शकत नसल्यामुळे झाड आपल्यावर घाव घालणाऱ्याच्या भाऊबंदांनाच मदत मागत असतं, असं मानून मदत करायला काय हरकत आहे? सुंदरलाल बहुगुणांच्या “चिपको’ आंदोलनात हेच घडलं होतं. परंतु, आर्थिक प्रगतीच्या धबडग्यात जिथं शेजाऱ्याविषयीही संवेदना उरल्या नाहीत, तिथं झाडांची काय कथा! पण झाडांनी मात्र शेजारधर्म सोडलेला नाहीये बरं का!
न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंड भागातल्या जंगलात एका तोडलेल्या झाडाच्या बुंध्याने संशोधकांचं लक्ष वेधून घेतलं. “कौरी’ नावानं ओळखला जाणारा हा वृक्ष सामान्यतः 40 ते 50 मीटरपर्यंत वाढतो आणि खोडाचा घेर 5 मीटरपर्यंत असतो. कापल्यानंतर या बुंध्याला नव्यानं फांद्याही फुटल्या नव्हत्या किंवा पालवीही नव्हती. पण ते खोड जिवंत होतं. सॅबेस्टियन ल्यूजिंगर आणि मार्टिन बाडेर यांना योगायोगानं हा बुंधा दिसला आणि त्यांनी तो जिवंत असण्यामागचं गुपित शोधायला सुरुवात केली.
तसं पाहायला गेलं तर मृत झाडाच्या बुंध्याला त्याचे “शेजारी’ मुळांमार्फत पोषणद्रव्यं देऊन जिवंत ठेवतात, हे विज्ञानाला ठाऊक होतं; पण त्याचा पुरावा सापडला नव्हता. संशोधकांनी शेजारच्या झाडांमधलं आणि या बुंध्यामधलं पाण्याचं प्रमाण मोजून पाहिलं. त्यात ताळमेळ असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. म्हणजेच आजूबाजूच्या झाडांनी त्याला जीवनद्रव्य पुरवून
“लाइफ सपोर्ट सिस्टिम’वर ठेवलं होतं. वास्तविक बुंध्यापासून तोडल्यामुळे निसर्गनियमाप्रमाणे हा वृक्ष संबंधित परिस्थितकीचा (इकोसिस्टिम) भाग राहिला नव्हता. मग शेजाऱ्यांनी घासातला घास त्याला भरवण्याचं कारण काय? प्राथमिक संशोधनात असं आढळलं, की त्या वृक्षाची मुळं आसपासच्या झाडांच्या मुळांशी एकजिनसी झाली आहेत आणि त्यातून अन्नपुरवठा चाललाय. झाडांमध्ये बऱ्याच वेळा असं होतं म्हणे!
आपल्याकडे “दो जिस्म एक जान’ वगैरे म्हणतात, ते राजकीय घोषणांसारखंच! झाडं मात्र ते करून दाखवतात. पोषक घटक सगळ्यांना समप्रमाणात मिळावेत, केवळ आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जंगलाला स्थिरता मिळावी, म्हणून झाडांचा जमिनीखाली हा खटाटोप सुरू असतो. म्हणजे त्यांचं प्रेम वरून दिसूनही येत नाही. वृक्ष उभा राहत असताना सुरू झालेलं हे सहजीवन वृक्ष आडवा झाल्यावरही कायम राहिलं. रंगांवरून भांडणारा माणूस यातून काही बोध घेईल..?