– हिमांशू
‘अमकेतमके कुठे राहतात हो?’ हा प्रश्न शहरात कुणाला विचारला तर संबंधित व्यक्ती विचारणार्याच्या चेहर्याकडे लक्षही न देता ‘नही मालूम’ एवढंच बोलून निघून जाते. गावखेड्यातही काही प्रमाणात आता ही परिस्थिती दिसू लागली असली, तरी अजूनही बर्याच ठिकाणी लोक थेट संबंधिताच्या घरापर्यंत पोहोचवायला येतात; शिवाय ते घर येईपर्यंत त्याची संपूर्ण कौटुंबिक माहितीही पत्ता विचारणार्याला पुरवतात, जी बर्याच वेळा अनावश्यक असते. महानगरात पहिल्यांदाच जाताना तर जाणकार वाटाड्या सोबत असण्याची आत्यंतिक गरज भासते. पण तेही दिवस आता मागे गेलेत आणि मोबाइलवर महिलेच्या मंजुळ आवाजात पत्ता सांगणारं तंत्रज्ञान आपल्या खिशात आहे.
आमच्या मित्रांनी तिचं नाव ‘गूगलबाई’ ठेवलंय. पण गाडीचा वेग आणि गूगलबाईचं निवेदन यामध्ये आम्हा मंडळींची नेहमी गल्लतच झालीये. बर्याच वेळा जिथून वळायचं, तो चौक मागे गेल्यावर समजतं आपण पुढे आलो आहोत आणि मग पुढच्या चौकातून ‘यू-टर्न’ घ्यावा लागतो. बर्याच वेळा हा मॅप निकामी ठरतो. जिथं नेटवर्क नाही, तिथं वाट दाखवता-दाखवता मोबाइलचे डोळे अचानक पांढरे होतातच; पण मॅप ङ्गॉलो केल्यामुळे आपण भलत्याच ठिकाणी पोहोचलो, असाही अनुभव येतो. अशावेळी गाडीची काच खाली करून कुणालातरी विचारणंच चांगलं!
पण बर्याच वेळा स्थानिक लोकही पत्ता सांगून-सांगून थकतात. त्यातल्या त्यात मॅप चुकीचा रस्ता दाखवत असल्यामुळे एखाद्या ठिकाणी सगळ्यांचीच ‘वाट वाकडी’ होत असेल, तर गावकरी तरी किती जणांना योग्य रस्ता दाखवणार? कर्नाटकातल्या कोडगू जिल्ह्यात एके ठिकाणी स्थानिकांनी स्थानिक साहित्य वापरून तयार केलेला बोर्ड सध्या चर्चेत आहे. ‘गूगल मॅप चुकीचा आहे. हा रस्ता संबंधित हॉटेलकडे जात नाही,’ अशा आशयाचा मजकूर गावकर्यांनी या बोर्डवर इंग्रजीत रंगवलाय. चुकीच्या मॅपमुळे गावकर्यांना झालेल्या त्रासाची संपूर्ण कहाणी अगदी थोडक्यात सांगणारा हा मजकूर आहे. कुठल्यातरी वळणावरून यांत्रिक नॅव्हिगेशन मॅपचं म्हणणं खरं मानून लोक चुकीच्या दिशेला वळत असणार आणि मग भलत्याच ठिकाणी पोहोचत असणार.
अशी ङ्गसगत ज्या-ज्या ठिकाणी होते, तिथं गाडी जाण्याएवढाही रस्ता समोर दिसेनासा झाला, किंवा ‘डेड एन्ड’ आला की मगच आपण चुकलोय, हे समजतं. माघारी ङ्गिरणं अनिवार्य असलं, तरी गाडी वळवण्यापुरती जागाही बर्याचदा मिळत नाही. हल्ली पर्यटनासाठी ‘अन्नोन डेस्टिनेशन’ शोधण्याची स्पर्धा लागल्यामुळे अनेकांना हा ‘चकवा’ ठिकठिकाणी लागतो. अशा ‘रिमोट’ ठिकाणी मॅप नेमका गंडतो. रस्ता चुकल्यामुळे, योग्य वेळी इच्छित ठिकाणी पोहोचू शकत नसल्यामुळे होणारा मनस्ताप कमी करण्याचे उपाय आहेत. आपण जिथे चुकलो आहोत, तो परिसर कुतुहलाने पाहावा. तिथंही आपल्यासारखीच माणसं राहतात. त्यांचं जगणं कसं आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हे लोक पाणी कुठून आणतात, हे बाटलीबंद मिनरल वॉटर पिता-पिता जाणून घ्यावं. आजूबाजूला पोरं दिसतील; मग शाळा दिसते का, पाहावं. भटकंतीचा एक हेतू हाही असण्याला काय हरकत आहे?