– हिमांशू
माणसाच्या प्रगतीचं प्रदर्शन मांडलंय आम्ही… अभिमानानं! गुहेत राहून दगडाच्या हत्यारांनी शिकार करणारा माणूस आज आपल्यासारखाच यांत्रिक माणूस तयार करतोय आणि त्याच्याकडून कामं करवून घेतोय, याचा गर्व आहे आम्हाला. बुलेट ट्रेनच्या वेगानं धावतो आहोत आम्ही. चंद्राला, मंगळाला स्पर्श करणारी यानं अवकाशात सोडतो आहोत आम्ही. पण काहीजणांना हा वेग सहन होत नाही. ही माणसं संख्येनं भरपूर आहेत. किंबहुना त्यांचीच संख्या जास्त आहे. आमच्यापेक्षा कितीतरी पट! ही माणसं आम्हाला म्हणतात, “धावण्यासाठी तुम्ही आम्हाला कधी शक्तीच दिली नाही.’
आता सांगा, स्पर्धेच्या या युगात माणूस आपली शक्ती धावण्यासाठी वापरेल की कुणाला देण्यासाठी? सरकार तरी किती करणार? कल्याणकारी अर्थव्यवस्था असताना जे जमलं नाही, ते आता उदारीकरणाच्या दिवसांत कसं जमायचं? आमच्यात आणि त्यांच्यात असलेली दरी वाढतच चाललीय. म्हणून मग आम्ही त्यांच्यात आणि आमच्यात एक उभी रेष आखलीय. इंडिया इकडे आणि भारत तिकडे. आता इकडून तिकडचं अजिबात दिसत नाही. कधीतरी त्या जगातली एखादी घटना वर्तमानपत्रातून समजते. ती इतकी धक्कादायक असते, की वाटतं ही माणसं अजून सहाव्या-सातव्या शतकात आहेत की काय? धावता येत नाही म्हणून या मंडळींनी प्रवासच थांबवला की काय? चुकून एखाद्या दिवशी त्यांच्या जगात जायचा प्रसंग आला तर काय होईल? बरं झालं बाबा, आपण पुढे निघून आलो..!
परवाचीच गोष्ट. यवतमाळ जिल्ह्यात कुठलंसं दुर्गम गाव आहे म्हणे. खरंतर हल्ली “दुर्गम’वगैरे काही राहिलेलंच नाहीये. अशा भागात हल्ली आमची फार्म हाउस असतात. अर्थात, तिथून यांची घरं शक्यतो दिसू नयेत याची काळजी आम्ही घेतो. पण तरी बातमी कळलीच. या गावातल्या एका महिलेला मुलगी झाली. प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्माला आलेल्या मुलीचं मजूर आईवडिलांनी स्वागत वगैरे केलं. बाळाची तब्येत चांगली असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी पाठवलं. पण त्याच दिवशी रात्री बाळ जोरजोरात रडू लागलं.
काही केल्या थांबेचना! त्याला काही होत असावं का? नेमकं काय कारण असेल रडण्याचं? छातीत कफ साठला असेल का? पोट दुखत असेल का? बाळाच्या आईवडिलांना काहीच समजेना. अशा वेळी लगेच डॉक्टरांकडे जायला हवं की नाही? असू दे हॉस्पिटल कितीही लांब… असू दे रस्ता कसाही… नसू दे मोबाइलला रेंज… असू देत वाटेत जंगली जनावरं… आम्ही तर अशा वेळी डॉक्टरांनाच घरी बोलावलं असतं. फक्त व्हिजिटिंग फी द्यावी लागली असती. त्यात काय एवढं? पण या बाळाच्या आईवडिलांनी भलतंच केलं.
घरातल्या म्हाताऱ्या-कोताऱ्या माणसांचं ऐकलं आणि बाळाच्या पोटावर बिब्ब्याचे चटके दिले. आई गं… हॉरिबल! किती अन्ह्यूमन वागतात ना हे लोक! अशा उपायांनी बाळ बरं होणारंय का? उलट त्याचं दुखणं जास्तच वाढलं. मग दुसऱ्या दिवशी धावतपळत सगळे यवतमाळच्या हॉस्पिटलात गेले. तिथून डॉक्टरांनी बाळाला नागपूरला न्यायला सांगितलं. पण अघोरी उपाय करणाऱ्या आईवडिलांना हे आधीच कळायला नको होतं का? हल्ली पूर्वीसारखं अवघड राहिलंय का? जग किती बदललंय! पण ह्यांना सांगणार कोण?