-हिमांशू
चाललंय तरी काय या सुसंस्कृत महाराष्ट्रात? पूजनीय संतांपासून द्रष्ट्या समाज सुधारकांपर्यंत एक प्रदीर्घ परंपरा ज्या महाराष्ट्राने देशाला दिली, तिथंच हे असं घडावं! तांत्रिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या आघाडीचं म्हणवलं जाणारं हे राज्य अचानक नैतिकदृष्ट्या एवढं रसातळाला कधी गेलं? इथे संदर्भासह स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ज्या घडामोडी घडत आहेत, त्याकडे आमचा रोख बिलकूल नाही. गैरसमज नसावा. विषय वेगळाच आहे.
तुमचा-आमचा. राजकीय आघाडीवर कदाचित ज्याची चर्चाही होणार नाही, असा! दखलच नाही घेतली तर उपाययोजना कोण करणार? त्यामुळे जे घडतंय त्याला आपणच सामोरे जाणार आहोत; जात आहोत. विशेषतः ज्यांच्या घरात पोरीबाळी आहेत, अशी कुटुंबं! तरुण मुलींकडे आणि महिलांकडे पाहून शेरेबाजी करणं काही नवीन नाही. पण त्याचं वाढलेलं प्रमाण निश्चितच उद्याच्या धोक्याचे संकेत देणारं आहे. महिलांकडे पाहून अश्लील टिप्पणी करणं, घाणेरड्या शब्दांत शेरे मारणं, टोमणे मारणं अशा कृत्यांमध्ये महाराष्ट्राचा देशात तिसरा नंबर लागलाय.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडून घेतलेल्या आकडेवारीवरून केंद्र सरकारने ही माहिती दिलीये. अर्थात ‘सापडला तो चोर’ हे समीकरण आपल्याकडे ‘वरपासून खालपर्यंत’ झिरपलेलं आहेच. पण ही आकडेवारी सापडलेल्या व्यक्तींची नसून, नोंद झालेल्या गुन्ह्यांची आहे. लाज आणणार्या अशा कित्येक घटना पोरीबाळींनी तक्रार न करता सहन केल्या असतील. आकडेवारीवर नजर टाकली, तर मध्य प्रदेश आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रापेक्षा अधिक संख्येने झालीये.
देशभरात एका वर्षात 25 हजारांपेक्षा जास्त घटनांची नोंद पोलीसदफ्तरी झाली आहे. या सगळ्या घटना महिलांकडे पाहून अश्लील कॉमेन्ट करणं, बीभत्स हालचाली करणं, घाणेरडी गाणी म्हणणं अशा स्वरूपाच्या आहेत. महाराष्ट्रात एका वर्षात अशा नोंदणीकृत घटनांची संख्या 4 हजार 222 इतकी आहे. आपण असं गृहित धरू शकतो की, अगदीच असह्य झाल्यानंतर संबंधित महिलांनी तक्रार नोंदवली असणार. म्हणजेच, घटनांची संख्या कितीतरी अधिक असणार.
या गुन्ह्यांना ‘नैतिक मूल्यांशी संबंधित गुन्हे’ असं संबोधण्यात आलंय आणि असे गुन्हे कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्राने राज्यांकडे अशा गुन्ह्यांची आकडेवारी पाठवली आहे. अर्थात, किमान महाराष्ट्रात अशी आकडेवारी तूर्तास तरी ङ्गायलीतच बंदिस्त राहील, असं एकंदर चित्र आहे. कारण त्याहून महत्त्वाच्या अनेक ङ्गायली अजून उघडायच्या आहेत; कारवाया व्हायच्या आहेत. या धबडग्यात बिचार्या नैतिक वगैरे मूल्यांचा नंबर कसा लागणार? परंतु घरातल्या महिला सुरक्षित राहण्यासाठी आपल्या दृष्टीने मात्र ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.
महिलांवर अश्लील कॉमेन्ट करण्याच्या घटना ज्या शहरांमध्ये अधिक प्रमाणात घडतात, अशा 19 शहरांची यादी तयार करण्यात आली असून, त्यातली पहिली दोन शहरं महाराष्ट्रातली आहेत. सगळे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सांगायचं झालं, तरी यादीत नागपूरचा नंबर पहिला आहे. असो, नैतिक अधःपतन कशाला म्हणायचं आणि कुठून सुरुवात करायची, हाच खरा प्रश्न!