जुन्नर- करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव तसेच मोहरमनिमित्त आयोजित कार्यक्रमांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे परवानगी मिळणार आहे. गणपती आगमन, दररोजची आरती व विसर्जन मिरवणूक याकरिता फक्त 5 कार्यकर्त्यांना परवानगी मिळणार आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई सक्तीने होणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
जुन्नर येथे आयोजित शांतता कमिटी बैठकीत संदीप पाटील बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आमदार अतुल बेनके, नगराध्यक्ष श्याम पांडे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना यांच्यासह शांतता समिती सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी व हिंदू-मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.
संदीप पाटील म्हणाले की, शतकातून एकदा महामारी येते ती यावेळी आलेली आहे. या महामारीमुळे प्रत्येकाला आपली जीवनपद्धती बदलावी लागते. सण, उत्सव यावरही मर्यादा येतात. त्यामुळे सामाजिक सलोखा राखून परिस्थितीनुसार सर्वांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आयुष प्रसाद म्हणाले की, “एक गाव एक गणपती’ या संकल्पनेचा विचार गांभीर्याने होणे आवश्यक आहे.
या उत्सवाकरिता ग्रामनिधी खर्च करता येणार नाही. तर गणेश मंडळांनी रक्तदान व आरोग्य शिबिरे घ्यावीत आणि नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
– अतुल बेनके, आमदार