नवी दिल्ली: लॉकडाऊन मुळे मंदावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे देशातील रोजगार निर्मीतीच्या प्रमाणावर जो लक्षणीय परिणाम झाला आहे त्यातून नवीन नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यताहीं मंदावल्या आहेत. पुढील तीन महिन्यात केवळ पाच टक्केच कंपन्यांनी काहीं प्रमाणात नवीन नोकर भरती करण्याचे योजले आहे.अन्य 95 टक्के कंपन्यांनी सध्या तरी थांबा आणि पहा हेच धोरण स्वीकारले आहे.
मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलूक या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, देशातील नोकऱ्यांच्या प्रमाणात पुढील तिमाहीत केवळ पाच टक्केच सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन नोकर भरतीत होणारी ही घट गेल्या पंधरा वर्षाच्या नीचांकी पातळीवरील आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नवीन नोकर भरती करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे असेही या अहवालात म्हटले आहे. देशातील लॉकडाऊन संपल्यांनतर देशातील डिमांड वाढेल आणि त्यातून व्यापार उदीम वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी तिमाहित तरी भारतीय कंपन्यांनी केवळ वाट पहाण्याचेच धोरण अवलंबले आहे त्यामुळे नोकऱ्यांमध्ये मात्र अपेक्षित वाढ होणार नाही.
सरकारने उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी जे पॅकेज जाहीर केले आहे त्याचा बाजारपेठेवर विधायक परिणाम होण्याचीही अनेकांना अपेक्षा आहे. त्यातून खाण उद्योग, बांधकाम उदयोग, वित्तीय आणि विमा कंपन्यांचा व्यवसाय वाढून त्यात नव्याने नोकर भरती होंईल अशी आशा आहे.