नानासाहेब पवार
नेवासा -भेटी लागी जीवा, लागलीसे आस अशी आर्त विनवणी करीत भाविकांना पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. करोनाच्या दहशतीमुळे चैत्र एकादशीची वारी रद्द झाली. आता येत्या आषाढी एकादशीच्या वारीला तरी विठूरायाचे दर्शन होईल, अशी ओढ भाविकांना लागली आहे. आषाढी एकादशीची वारी, सोहळा रद्द तर होणार नाही ना ? याची चिंता वारकरी संप्रदायाला पडली आहे.
येत्या 1 जुलै रोजी आषाढी वारीचा महासोहळा आहे. मात्र, जगभरात थैमान घातलेल्या करोना महामारीमुळे आजपर्यंतच्या इतिहासात झाले नाही ते झाले आणि विठुरायाचे राऊळ भक्तांसाठीच बंद झाले. आषाढी वारीचा सोहळा करावा की न करावा याबाबत वारकरी संप्रदायाचा निर्णय झालेला नाही. नेवासे तालुक्यातून शेकडो पायी दिंड्या विठूरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जातात. त्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. तर राज्यात शिस्तबद्ध म्हणून नावलौकिक मिळवलेली श्री क्षेत्र देवगड दिंडी तसेच श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज दिंडी, श्री क्षेत्र शनेश्वर देवस्थान शिंगणापूर दिंडीचा समावेश असतो.
आषाढी वारी दिंडीचे देवस्थान, संस्थानला व वारकऱ्यांना दोन महिन्यांपासून नियोजन करावे लागते. दिंड्याचे प्रस्थान साधारणपणे 15 जूनच्या आसपास असते. प्रत्येक दिंडीत हजारो भाविक सहभागी होतात. त्यांची दिंडी मार्गावरील राहण्याची, जेवणाची व्यवस्था हे नियोजन अगोदरच करावे लागते. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र जमा कसे होतील? र प्रशासन परवानगी देणार का ? एवढ्या मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पायी चालत जाण्यास परवानगी मिळेल का? असे अनेक प्रश्न वारकरी संप्रदायाला पडले आहेत.
पंढरीचा पांडुरंग संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व वारकरी संप्रदाय आस लावून बसला आहे. नियमांमध्ये थोडी शिथिलता देऊन व सोशल डिस्टन्सशिंगचा नियम पाळून दर्शनाला परवानगी देणे शक्य आहे. तरी वारकऱ्यांच्या भावनेचा विचार करून दिंडीला नाही तर किमान दर्शनाला परवानगी मिळावी अशी अपेक्षा आहे.
मच्छिंद्र महाराज निकम सलाबतपूर, ता. नेवासा