आमदार थोपटे यांच्या पाठपुराव्याला यश
भोर/पुणे (प्रतिनिधी) – राज्य शासनाने महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेले टोल नाके बंद केले आहेत. पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथील टोल नाका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत येतो. पीएमआरडीए हे महानगर असल्यामुळे महापालिकेच्या धर्तीवर खेडशिवापूर येथील टोल नाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर स्थलांतरीत करण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास खेड शिवापूर येथील टोल नाका पुणे जिल्ह्याच्या बाहेर स्थापन करावा लागणार आहे. पर्यायाने हा टोल नाका शिरवळ येथे स्थलांतरीत होऊ शकतो.
पुणे-सातारा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. रस्त्याच्या कामांना अनेक वेळा मुदतवाढ देऊनही ही कामे मुदतीत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जो पर्यंत पुणे सातारा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत टोल आकारू नये, तसेच हा टोल पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर स्थापन करावा, अशी टोल नाका हटाव कृती समितीची मागणी आहे. यासंदर्भात आमदार थोपटे आणि कृती समितीचे पदाधिकारी यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीसुध्दा उपस्थित होते.
याविषयी माहिती देताना आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले की, पुणे-सातारा रस्त्याचे सेफिटी ऑफिट झाले असून त्यामध्ये हा महामार्ग प्रवासासाठी सुरक्षित नसल्याचे नमूद केले आहे. रस्त्यांच्या कामाचा दर्जा चांगला नाही, अनेक कामे अर्धवट आहेत. सेवा रस्त्याचे काम झालेले नाही. कामे अर्धवट असताना टोल आकारू नये, तसेच खेडशिवापूर येथील टोल नाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर नेमण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली आहे.
यामुळे खेडशिवापूर येथील टोलनाका नियमानुसार अन्य ठिकाणी स्थलांतरीत करावा लागेल. यामुळे खेडशिवापूर तसेच भोर तालुक्यातून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. याविषयी गडकरी यांनी येत्या दोन दिवसात माहिती घेऊन निर्णय घेणार असल्याचेही आमदार थोपटे यांनी सांगितले.