अंनिसची मागणी; मांढरदेव येथे पोती भरून खिळे, बाहुल्या, फोटो केले नष्ट
वाई – मांढरदेव (ता. वाई) गडावरील काळूबाईच्या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक येतात. करणीच्या नावाखाली डोंगरावरील झाडांना खिळे, बिब्बे, लिंबू, काळ्या बाहुल्या ठोकणाऱ्या आणि फोटो लावणाऱ्या देवऋषी व अन्य लोकांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली.
झाडांना काळ्या बाहुल्या, चिठ्ठ्या, बिब्वे, लिंबू खिळ्यांच्या व दाभणाच्या साहाय्याने ठोकल्या जातात. फोटोला टाचण्या टोचल्या जातात. जिवंत कोंबड्या दोराच्या साह्याने झाडांना लटकविल्या जातात, याचे पुरावेच अंनिसच्या सातारा व पुणे येथील कार्यकर्त्यांनी आज मांढरदेव गडावर जाऊन गोळा केले. असे पोती भरून साहित्य काढून कार्यकर्त्यांनी ते नष्ट केले. अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, सुभाष सोळंकी, भगवान रणदिवे, वंदना माने, राम सर्वगौड, भगवान काळभोर, श्रीराम नलावडे, ऍड. धुमाळ उपस्थित होते.
मांढरादेवी येथील काळूबाईची यात्रा 9 ते 11 जानेवारीला भरणार आहे. यात्रेच्या काळात गडावर नरबळीची घटना घडण्याची भीती आहे. हे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी अंनिसने केली आहे. यात्रेसाठी येणारे लोक व देवऋषी करणीच्या नावाखाली अनेक गोष्टी मंदिरापासून अगदी जवळ केल्या जातात.
अशा गोष्टी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद लिहिलेले फलकही देवस्थान ट्रस्टमार्फत लावण्यात आले आहेत; परंतु मंदिराचे पुजारी, देखभाल करणारे ट्रस्टी याबाबत तितकेसे जागृत असलेले दिसत नाहीत. करणीच्या नावाने लोकांना फसवले जाते. अनेक अंधश्रद्धा पसरवल्या जात आहे. याला आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करतानाच जनतेने अशा अंधश्रद्धांना बळी पडून मानसिक व आर्थिक शोषण होऊ देऊ, नये असे आवाहन अंनिसने केले आहे.