एलओसीलगत होणाऱ्या धुमश्चक्रीबद्दल व्यक्त केली चिंता
बीजिंग: नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत भारत आणि पाकिस्तानच्या लष्करांमध्ये सातत्याने धुमश्चक्री होत असल्याबद्दल चीनने चिंता व्यक्त केली आहे. त्यातून भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन त्या देशाने केले आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे आम्ही शेजारी आहोत. त्यामुळे तणाव वाढेल अशी कृती न करण्याचे आवाहन आम्ही त्या देशांना करतो. त्यांनी चर्चेच्या माध्यमातून शांततेने वादांवर तोडगा काढावा. विभागीय शांतता आणि स्थिरता अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, अशी भूमिका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मांडण्यात आली. पाकिस्तानी सैनिक वारंवार कुरापती काढून शस्त्रसंधीचा भंग करतात. ते भारतीय हद्दीत मारा करतात. त्या माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीलगत मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला हौतात्म्य पत्करावे लागले. त्याशिवाय, सामान्य नागरिक असणारी एक महिलाही मृत्युमुखी पडली. त्या पाकिस्तानी आगळिकीला भारतीय जवानांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले.