नवी दिल्ली: भारताचे अमेरिकेशी कोणतेही व्यापार वाद नाहीत असे वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांनी म्हटले आहे. आज येथे इंडिया एनर्जी फोरमच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की ते म्हणाले की आमचे त्यांच्याशी व्यापार विषयक वाद नाहीत पण काही बाबतीत मतभेद जरूर आहेत.
द्विपक्षीय संबंधांबाबत असे मतभेद असतातच असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले सुदृढ संबंधांसाठी काही वेळा संबंधातील अनिश्चीतताही उपयुक्त ठरते असे मतही त्यांनी व्यक्त केले. भारत आणि अमेरिका या देशांतील व्यापार क्षेत्रात अमर्याद संधी आणि क्षमता आहे. त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. त्यासाठी अनुकुल उपाययोजना भारत सरकारकडून केली जात आहे असेही त्यांनी नमूद केले.
आयात मालावर डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज कडून ऍन्टी डम्पींग ड्युटी लावण्यात आली आहे. पण ही संस्था समन्यायिक संस्था असून त्यांच्या निर्णयाशी सरकारचा काही संबंध नाहीं असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सध्याच्या मंदीच्या वातावरणावर बोलताना ते म्हणाले की सरकारकडून योजल्या जाणाऱ्या उपाययोजनांमधून भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगीरी करेल अशी आपल्याला आशा आहे. मागील दोन तिमाही वगळता भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या पाच वर्षात चांगली कामगीरी केली आहे असा दाखलाही त्यांनी दिला.