बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी त्या देशाची गत
लेह -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी काश्मीर मुद्द्यावरून नक्राश्रू ढाळणाऱ्या पाकिस्तानची तीव्र शब्दांत खरडपट्टी केली. काश्मीरबाबत पाकिस्तानला कुठलाच अधिकार नाही. त्या मुद्यावरून कुठल्याच देशाकडून पाकिस्तानला बिल्कूल प्रतिसाद दिला जात नाही, असे त्यांनी म्हटले.
लडाखच्या लेहमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजनाथ बोलत होते. काश्मीर तुमचा होताच कधी हा प्रश्न मी पाकिस्तानला विचारू इच्छितो. पाकिस्तानच्या अस्तित्वाचा सन्मान आम्ही ठेवतो. पण, त्याचा अर्थ असा नव्हे की त्या देशाने काश्मीरबाबत सतत रडत रहावे. काश्मीर नेहमीच भारताचा भाग आहे. उलट, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टीस्तानवर अवैध कब्जा केला आहे, असे त्यांनी सुनावले.
काश्मीर मुद्द्यावरून कुठलाच देश पाकिस्तानबरोबर नाही. काश्मीरबाबतचे निर्णय म्हणजे भारताची अंतर्गत बाब असल्याचे अमेरिकेनेही मान्य केले आहे. मात्र, काश्मीरबाबत बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी त्या देशाची गत झाली आहे. शेजारी देश म्हणून पाकिस्तानशी चांगले संबंध भारत ठेऊ इच्छितो. मात्र, त्या देशाने आमच्या विरोधातील दहशतवादाचा वापर थांबवायला हवा, असेही राजनाथ यांनी स्पष्ट केले.