कराड, (प्रतिनिधी)- प्रचाराच्या माध्यमातून मोदीची गॅरंटी नावाने हुकूमशाहीचे बीज रोवण्याचे काम मोदींकडून होत आहे. मी पंतप्रधान झालो तरच विकास होईल, असे बोलून रशिया व चीनप्रमाणे दोन व्यक्तींमध्ये निवडणूक लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एकंदरीत ‘एक राष्ट्र, एक सरकार, एक नेता ‘ या हिटलरच्या घोषवाक्याप्रमाणे मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. चव्हाण म्हणाले, इंडिया आघाडीच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, संविधान बचाव आणि अत्याचार या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाईल. यातील संविधान बचाव हा सर्वात मोठा मुद्दा असून यावरच सर्वजण एकत्र आले आहेत. मोदींच्या दहा वर्षांच्या काळात देशाचा विकास मंदावला. भरमसाठ करवाढ, जीएसटी, महागाईमुळे अर्थव्यवस्था विस्कटली आहे.
शेतमालाचे भाव गोठवून, निर्यात बंदी करून इतर देशातून माल मागवल्यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. अन्यायकारक तीन कृषी कायदे मागे घ्यायला लावून शेतकर्यांनी मोदींचे नाक मातीत घातले. त्याचा सूड उगवण्यासाठी मोदी शेतकर्यांच्या बदला घेत आहेत. त्यामुळे युवक, महिला आणि शेतकरी मोदींना माफ करणार नाहीत.
पैशांचे आमिष दाखवून ईडी आणि सीबीआयची भीती घालून लोकांना वेठीस धरले. यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली. याला मोदींचा राजाश्रय होता. गुजरात, आसाम, गोवा हीही अशीच उदाहरणे आहेत. फितुरी, गद्दारी, विश्वासघात आणि पाठीत खंजिर खुपसण्याची संस्कृती महाराष्ट्राची नाही.
अशांना लोक पाडल्याशिवाय राहणार नसून ठाकरे आणि पवारांना यातून सहानुभूती मिळेल. या सगळ्यात काँग्रेस फुटली नाही. राज्यात ठाकरे सरकार राहिले असते तर लोकसभेला महायुतीची एकही जागा निवडून आली नसती. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विजयाची खात्री नसल्यानेच राज्यसभा सोडली नाही
याआधी सातार्यातून निवडणूक लढवताना खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता त्याच उमेदवाराला आपल्या विजयाची खात्री असती तर त्यांनी आधी राज्यसभेचा राजीनामा दिला असता आणि मग निवडणुकीला उभे राहिले असते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. यावरूनच सातार्यातील चित्र स्पष्ट होते, असे सूचक विधान आ. चव्हाण यांनी यावेळी केले.