मुंबई – यापूर्वी वातावरण बदलाचा विचार पत धोरण तयार करताना क्वचितच केला जात होता. मात्र सध्या वातावरण बदलल्यामुळे अनेक आर्थिक बाबीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत पत धोरण तयार करताना वातावरण बदलाचा विचार करावा लागत आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या मासिक अभ्यास अहवालात म्हटले आहे.
नकारात्मक वातावरण बदलामुळे अर्थातच संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्या देशाचे पतधोरण तयार करताना या बाबीचा विचार करणे अपरिहार्य आहे असे अहवालात सूचित करण्यात आले आहे. जागतिक तापमान वाढ होत आहे. त्याचा पिण्याचे पाणी आणि पिकावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम उद्भवतात.
या बाबी विचारात घेऊनच पतधोरण तयार करावे लागते. वातावरणातील बदलामुळे हवामानात अचानक बदल होतो. याची दखल पतधोरण तयार करताना घेणे गरजेचे झाले आहे. ते एक प्रकारचे आव्हानच निर्माण झाले आहे. वातावरण बदलामुळे संबंधित देशाच्या पाणीपुरवठा आणि अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होतो. त्याचबरोबर जागतिक वातावरण बदलामुळे जागतिक पातळीवरील अन्नधान्यावर परिणाम होतो. अश्या परिस्थितीमध्ये महागाईवर या बाबीचा परिणाम होतो.
पतधोरण तयार करताना प्रामुख्याने महागाईचा विचार केला जात असतो. त्यामुळे वातावरण बदलाबाबतही संवेदनाशी राहणे गरजेचे झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक देशाच्या रिझर्व्ह बँका पतधोरण तयार करताना विषय पत्रिकेवर वातावरण बदलाचा विषय प्रामुख्याने ठेवू लागल्या आहेत. जर सर्व देशांनी वातावरण बदलाबाबत सामूहिकरीत्या प्रयत्न केले नाहीत तर 2050 पर्यंत जागतिक उत्पादकतेवर याचा 9% नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर असे झाले तर त्या प्रमाणात महागाई वाढवून त्याचा दबाव पत धोरणावर येऊ शकतो असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.