पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील हायवा, टिपर, ट्रक, टेम्पो, ढंपरमध्ये भरुन आणलेला राडारोडा राजरोसपणे नदी पात्रात टाकला जात आहे. यामुळे नदीचे पात्र अरुंद होत असून पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका ओढवण्याची भिती वाटू लागली आहे.
याकडे राज्याच्या पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने राडारोडा टाकणा-यांना अधिकचे बळ मिळत आहे. याची तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या पर्यावरण विभागाने नदीपात्रात भराव टाकणा-या सात जणांवर सापळा रचून धडक कारवाई केली. त्यांच्याकडून ९ वाहने ताब्यात घेतली असून १ लाख १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पावसळ्यात शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांचे पात्र दुथडी भरुन वाहते. पावसाळा ओसरला की नद्यांचे पात्र कोरडे ठाक पडते. त्यामुळे शहरातील काही व्यावसायिकांकडून नदीपात्रात राजरोसपणे राडारोडा टाकला जातो. त्यामुळे नद्यांचे पात्र अरुंद होत चालले असून पावसाळ्यात पुर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवत आहे.
अशाच प्रकारे काळेवाडी, चिंचवड, कासारवाडी भागात पवना नदीपात्रात दिवसाढवळ्या राडारोडा टाकला जात आहे. मोठ मोठे हायवा, टिपर, टेम्पो, ट्रॅक्टरमध्ये भरुन आणलेला भराव नदीपात्रात उलतला जात आहे. शहराच्या विविध भागात राजरोसपणे हा प्रकार घडत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने धडक कारवाई करुन वाहन चालक सात जणांना ताब्यात घेतले. तर, राडोराडा टाकण्यासाठी वापरली जाणारी ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, ढंपर, आरएमसी प्लॅन्टच्या मिक्सर गाड्या अशी नऊ वाहने जप्त केली आहेत.
पर्यावरण विभागाने ८ ते २१ मार्च दरम्यान ही कारवाई केली. त्यामध्ये शिवा राठोड (वाहन केए ३३, टीबी २३२२), उमेश बारणे (वाहन एमएच १४, जेएल ९०८५), वेदांत देसाई (वाहन केए ३३, केए २१०५), आर. डी. वाघोले (वाहन एमएच १४, डीएम ६४३२ व एमएच १२, टीएम ०८७२), तेजस उक्के (वाहन एमएच २०, सीआर २१९१ व एमएच १४, एलए ८३२८), प्रकाश चौधरी (वाहन एमएच १२, क्युडब्ल्यु ११४१), कांतीलाल खिरु पवार (वाहन एमएच १४, बीएम ९८२), अशी नऊ वाहने जप्त केली आहेत.
त्यांच्यावर १ लाख १५ हजार रुपयांची दंडत्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिका पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मल्टीपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे, कनिष्ठ अभियंता स्वप्निल पाटील, केमिस्ट पुष्पराज भागवत यांंच्या पथकाने ही कारवाई केली. त्यासाठी पर्यावरण पथक प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे, तसेच एमएसएफ व मेस्कोच्या जवानांच्या पथकाची मदत घेण्यात आली.
नदी पात्रात व नाल्यांच्या बाजुने राडारोडा किंवा भराव टाकणे गुन्हा आहे. तरी असे प्रकार निदर्शनास आल्यास अथवा आरएमसी प्लॅन्टद्वारे हवा प्रदूषण करत असल्याचे समजल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल. शिवाय, त्यांना दंडात्मक कारवाईला देखील सामोरे जावे लागेल.- संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग