पारनेर, (प्रतिनिधी) – दरवर्षी सामाजिक संस्था, वन्यप्रेमीं कडून पाणवठ्यात पाणी सोडले जात होते, मात्र हे पाणवठेच निकामी झाल्याने भर उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी लाहीलाही होताना दिसत आहे. नियमितपणे उन्हाळ्यात वनविभागाकडून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढला असून वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ससेहोलपट पाहता वनविभागाच्या वतीने पाणवठ्यात पाणी सोडावे, अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.
भोयरे गांगर्डा, कडूस, पळवे, जातेगाव याठिकाणी वनविभागाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. त्याचबरोबर माळरान, डोंगर दर्या मोठ्या प्रमाणात असल्याने वन्यप्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. पळवे रस्त्यालगत वन्यप्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र, कायमस्वरूपी हे पाणवठे कोरडे रहात असल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे.
भोयरे गांगर्डा हे गाव चारही बाजूने डोंगरात वसलेले असल्यामुळे या ठिकाणी हरिण, ससे, कोल्हे, रानडुक्कर, हिंस्र प्राणी लांडगे यासह पशु-पक्षी यांचे मोठे वास्तव्य आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची खास आवश्यकता असते. वनविभागाच्या वतीने वीस ते बावीस वर्षांपूर्वी ठिकठिकाणी पाणवठे बांधण्यात आले आहेत मात्र त्या “पाणवठ्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा” अशीच झाली आहे. याकडे वन विभागाने गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष केल्याने हे पाणवठे गळू लागले आहेत.
दरवर्षी सामाजिक संस्था, वन्यप्रेमीं कडून या पाणवठ्यात पाणी सोडले जात होते, मात्र हे पाणवठेच निकामी झाल्याने भर उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी लाहीलाही होताना दिसत आहे. परिणामी हे प्राणी लोकवस्तीकडे वळू लागले आहेत. जवळच नगर- पुणे महामार्ग जात असल्याने पाण्याच्या शोधात अनेक हरणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
साधारण डिसेंबर ते जानेवारीपर्यंत विहीर किंवा बोअरवेलला पाणी टिकते. यादरम्यान शेतात पिकाला पाणी देण्याचे काम चालू असते. त्यामुळे वन्यप्राणी आपली तृष्णा भागवतात. मात्र, फेब्रुवारीनंतर बोअरवेल कमी झाल्यानंतर प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. किमान वनविभागाच्या वतीने तीन ते चार महिने पाणवठ्यात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी. – संतोष गांगड, चेअरमन, भोयरे गांगर्डा.