पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मानवी शरीर आणि निसर्ग यांच्यात अद्वैत असून, निसर्गपूरक जीवनशैली स्वीकारल्यास आपण अनेक आजार टाळू शकतो, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी रविवारी केले.
मधुमेहमुक्ती क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्य करणाऱ्या डायबेटीस फ्री फॉरएव्हर या संस्थेतर्फे जीवनशैली बदलातून मधुमेहमुक्त झालेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी डायबेटीस फ्री फॉरेव्हरचे संस्थापक डॉ. भाग्येश कुलकर्णी आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ उपस्थित होते.
या वेळी पोंक्षे यांनी स्वत:चा कॅन्सर मुक्तीचा प्रवास सांगितला. पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आज आपण पाश्चात्यांनी वर्ज्य केलेले संस्कार हिंदू संस्कृतीत आणून पाहात आहोत. हिंदू संस्कृती आणि धर्मशास्त्रामध्ये मानवी जीवनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून काटेकोर विचार केला आहे. निसर्गचक्र, खगोलशास्त्र, अवकाश आणि मानवी भावभावनांचा परस्पर संबंध याचे विस्तृत विवेचन आणि मांडणी आपल्या ग्रंथांमध्ये आढळून येते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जात आहोत, असे पोंक्षे म्हणाले.
मनुष्य सोडून इतर प्राणी निसर्गपूरक जीवनशैली अवलंबित असल्याने त्यांना आपल्यासारखा दुर्धर आजारांचा सामना करावा लागत नाही; परंतू निसर्गावर मात करण्याच्या अतिमहत्त्वाकांक्षेच्या मानवी वृत्तीमुळे मनुष्याने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.
ते बिघडलेले चक्र सुधरवण्यासाठी पुन्हा एकदा निसर्गपूरक जीवनशैलीकडे वळणे अपरिहार्य आहे. रिजनल, सिझनल आणि ओरिजनल ही आपल्या आरोग्याची त्रिसूत्री, तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील परस्पर समन्वय हा आपल्या निरोगी जीवनाचा पाया असला पाहिजे, असेही पोंक्षे यांनी नमूद केले.
डॉ. कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. दिवसभरातील विविध सत्रांमध्ये जीवन विद्या मिशनचे प्रमुख प्रल्हाद वामनराव पै यांचे आरोग्य तनाचे, मनाचे या विषयावर, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी डायबेटिस रिव्हर्सल कसे टिकवावे या विषयावर, तर डायबेटीस फ्री फॉरएव्हरचे संस्थापक डॉ. भाग्येश कुलकर्णी यांचे आनंदोत्सव मधुमेहमुक्तीचा या विषयावर व्याख्यान झाले.