Maharashtra weather – मागच्या आठवड्याभरापासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस आणि गारपीट पाहायला मिळत आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच आता हा पाऊस राज्याच्या काही भागांमध्ये आणखी २४ तास राहणार असल्याचा अंदाज आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २४ तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश यासह अनेक राज्यांना पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावली असतानाच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यवतमाळ येथे कमाल तापमान ३९.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यातच येत्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसासह गारपीट होण्याचा इशारा विभागाने दिला आहे.
मुंबईत कसे असेल हवामान?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अंशत: ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत काही भागात पावसाची शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे