पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुंढवा, केशवनगर, खराडी येथे नदीवर अक्षरश: डासांचे थवेच्या थवे असताना या परिसरातील नागरिक नदीमध्ये साठलेली जलपर्णी महापालिकेला काढूच देत नसल्याचा प्रकार महापालिकेच्या अधिकार्यांना अनुभवायला येत आहे. त्यामुळे या डासांचा बंदोबस्त कसा करावा, यासंदर्भात महापालिकेपुढे मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
मुंढवा, केशवनगर, खराडी या भागांत नदीपात्रातील जलपर्णीमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची व्युत्पत्ती होऊन अक्षरश: डासांचे थवेच्या थवे या भागात फिरत आहेत. थंडीच्या महिन्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. त्यातून जलपर्णी हे डासांच्या व्युत्पत्तीसाठी अतिशय पोषक असतात. त्यामुळे याठिकाणी डासांची संख्या एवढी वाढली आहे, की पक्ष्यांप्रमाणे यांचे थवे येथे दिसून येत आहेत. याचे अनेक व्हिडिओही गेल्या चार पाच दिवसांपासून व्हायरल होत असून, आरोग्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब झाली आहे.
जलपर्णींमुळे डासांची ही पैदास होते हे माहिती असताना नदीपात्रालगतच्या सोसायट्या आणि शेतकरी महापालिकेला जलपर्णी काढण्यास मज्जाव करत आहेत. महापालिकेचे कर्मचारी तेथे जलपर्णी काढण्यासाठी गेले असता, तेथील नागरिकांनी त्यांना ती काढू दिली नाही.
ग्रामस्थांनी जलपर्णी पुढे ढकलली
महापालिकेकडून जलपर्णी काढून ती नदीकाठावर टाकली जाते. ती तिथेच पडून राहाते, उचलली जात नसल्यामुळे कुजते आणि त्यामुळे डास तर वाढतातच; परंतु दुर्गंधीही सुटते. त्यामुळे तेथील नागरिक जलपर्णी काढू देत नाहीत. मात्र, ती जलपर्णी पुढे ढकलली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आपल्या भागात जरी डासांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला तरी तो पुढच्या भागात त्रास सुरू राहतो.
आम्ही दोन दिवसांत बैठक घेऊ – माधव जगताप, उपायुक्त, पुणे महापालिका
जलपर्णी काढल्या काढल्या ती उचलून नेता येत नाही, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. जर तसेच नेले, तर रस्त्यावर पाणी सांडत जाते. त्यामुळे पाणी गळून गेल्यानंतर ती जलपर्णी नेऊ शकतो. आम्ही ती वेळेत उचलून नेऊ, असे ग्रामस्थांना सांगितले आहे. याशिवाय जलपर्णी टाकण्यासाठी शेजारी जागाही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी पाटबंधारे खात्याशी बोलणे आवश्यक आहे. ग्रामस्थ, महापालिका आणि पाटबंधारे खात्याचे संबंधित अधिकारी यांच्याशी येत्या दोन-तीन दिवसांत बैठक घेऊन आणि व्हिजिट करून तोडगा काढू. काही भागात आम्ही ही जलपर्णी बांधून ठेवली आहे. त्यामुळे ती फार पसरत नाही.
लगेचच उचलून न्यावी – रुपेश उन्द्रे, सरपंच, मांजरी
आजूबाजूला शेती आहे. त्यामुळे जलपर्णी काढली तरी लगेचच उचलून नेली जात नाही. त्यामुळे नागरिक, शेतकरी हे टाकायला नकार देतात. मात्र, ती वेळेत उचलून न्यावी, ही आमची मागणी आहे. सध्या ही जलपर्णी मुंढवा, केशवनगर भागात आहे. पुढे ती सरकत जात आहे.
आम्ही तेथील सोसायट्यांमध्ये फॉगिंग सुरू केले आहे – डॉ. देवकर, सहाय्यक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका डासांचे थवेच्या थवे हवेत फिरत असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. आम्ही या भागात जंतुनाशकाची फवारणी, धूरफवारणी सुरू केली आहे. जलपर्णीमुळेच हे होत असल्याने ती काढणे महत्त्वाचे आहे.