पुणे – भारतातील प्रत्येक ९ व्यक्तींमागे एकाला कर्करोगाचा (कॅन्सर) धोका आहे. त्यामुळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ने २०२५ पर्यंत कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये १२.७ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. वेळेत निदान, तात्काळ उपचार यासह पौष्टिक आहार, व्यायाम, ताणतणाव नियंत्रण यामुळे कर्करोग रोखता येऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि ग्लोबोकॅनच्या 2020 च्या डेटानुसार महिलांमध्ये स्तन, सर्व्हाइकल, गर्भाशय, अंडाशय, लिप, ओरल कॅव्हिटी आणि आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण आढळले आहे, तर पुरुषांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये लिप, ओरल कॅव्हिटी, फुफ्फुसाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर आणि आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण आढळले आहे. त्याबरोबरच अन्ननलिकेचा कॅन्सर देखील आढळत आहे. १४ वर्षांखालील मुलांना लिम्फॉइड ल्युकेमिया, रक्ताशी संबंधित कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ नुसार, भारतातील ३० ते ४० वर्षे वयोगटातील केवळ ०.९ टक्के महिलांनी त्यांच्या आयुष्यात कधीही स्तनाच्या कर्करोगाची तपासणी केलेली नाही. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी हा आकडा १.९ टक्के आहे. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे. २०२० मध्ये भारतात कर्करोगामुळे ७.७० लाख मृत्यू झाले. स्क्रिनिंग व्यतिरिक्त वेळेवर उपचार केल्यास ३७ टक्के महिलांना कर्करोगासारख्या आजारापासून वाचवता येऊ शकते.
बदलती जीवनशैली आणि उशिरा निदान
२०२० मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १३.९२ लाख (सुमारे १४ लाख) कॅन्सरची प्रकरणे होती, जी २०२१ मध्ये १४.२६ लाख झाली आणि २०२२ मध्ये १४.६१ लाख झाली. त्यामुळे देशात केवळ हृदयविकार, मधुमेह आणि श्वसनाचे आजारच नव्हे, तर कॅन्सरचे रुग्णही वाढत आहेत. वाढते वय, जीवनशैलीतील बदल, व्यायामाचा अभाव आणि पौष्टिक आहाराचा अभाव यामुळे कॅन्सर रुग्ण वाढत आहेत. त्यात उशिरा निदान झाल्यामुळे कॅन्सर अधिक पसरतो आणि जीवघेणा ठरत आहे.
कॅन्सरची लक्षणे
- अनपेक्षित वजन कमी होणे
- ताप आणि थकवा येणे
- त्वचेवर होणारे बदल
- मलमूत्र विसर्जनात होणारे बदल
- बऱ्या न होणाऱ्या जखमा
- रक्तस्त्राव
- शरिराच्या कोणत्याही भागात कडकपणा किंवा गाठ
- गिळण्यास अडचण
- सतत खोकला किंवा घशात होणारी खवखवकर्करोग निदानासाठी या कराव्यात चाचण्या
- मॅमोग्राम
- कोलोनोस्कोपी
- पीएसए टेस्ट
- बायोप्सी
- सीटी स्कॅन
- एमआरएआय स्कॅन
- रक्ताच्या चाचण्या
- त्वचा तपासणी
- पीईटी स्कॅन
- एंडोस्कोपी
- बोन स्कॅन
“एचपीव्ही लस आणि नियमित पॅप स्मीअर्सचा गर्भाशयाचा कर्करोग रोखू शकतो. या प्रकारचा कर्करोग १२ टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज असून, २०२५ पर्यंत अंदाजे ८५ हजार २४१ रुग्ण बाधित होतील. त्यामुळे या आजाराची जनजागृती, तपासणी आणि लसीकरण महत्त्वाचे आहे.” – डॉ. मृणाल परब – कर्करोग तज्ज्ञ
“नोकरी करणाऱ्या महिलांनी आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. सुमारे ९० टक्के नोकरदार महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस घेत नाहीत आणि ८५ टक्के महिलांना कर्करोगापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लसी आणि तपासणीबद्दल माहिती नसते. त्यामुळे सर्व्हायकल कर्करोगाचा वाढता धोका टाळण्यासाठी नियमित एचपीव्ही आणि पॅप स्क्रिनिंग चाचणी करून घेणे गरजेचं आहे.” -डॉ. मधुलिका सिंग- प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ