नवी दिल्ली – देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी प्रतिकूल परिस्थितीत भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत आणि त्यांनी पुकारलेला हा लढा जर अयशस्वी झाला तर मोदी सरकारच्या पुढील काळात लोकांना अधिक त्रास होईल आणि देशावर गंभीर स्थिती ओढवेल असा इशारा कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिला आहे.
काँग्रेसच्यावतीने खर्गे यांनी गांधींचे आभार मानले आणि त्यांनी यात्रा काढण्याचा निर्णय हा पक्षातील कोणत्याही नेत्याने उचललेले सर्वात मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी या देशातील तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब लोकांसह सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत. प्रतिकूल परिस्थिती आणि थंडी असतानाही ते यात्रा काढत आहेत. ते भाजप सरकारच्या अत्याचाराविरुद्ध लढत आहेत, असे खर्गे यांनी पूर्व दिल्लीतील न्याय संकल्प संमेलन मेळाव्यात बोलताना सांगितले. हा लढा लोकशाही आणि देशाचे संविधान वाचवण्यासाठी आहे, या लढाईत काँग्रेसला साथ देण्यात तुम्ही अपयशी ठरल्यास तुम्ही मोदींचे गुलाम व्हाल, असे ते म्हणाले.
मोदी अनेक प्रकारची गॅरंटी देऊन लोकांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत. त्यांची एकही गॅरंटी आत्तापर्यंत यशस्वी ठरलेली नाही किंवा पुर्ण झालेली नाही. त्यांचे रोजगाराचे आश्वासन फसवे निघाले, विदेशातून काळा पैसा आणण्यात त्यांनी अपयश आले. त्यांनी केवळ सत्ता मिळवण्याचेच कारस्थान रचले आणि त्यासाठी सर्वांना मनस्ताप दिला असा आरोपही खर्गे यांनी केला. आमची लढाई आरएसएस आणि भाजपच्या विरोधात आहे. त्यांना देश संपवायचा आहे आणि गरिबांना दूर करायचे आहे. भाजपच्या फुटीर धोरणाविरोधात जागृती करण्यासाठी काँग्रेसला घराघरात जावे लागेल, असे ते म्हणाले.
मोदी सरकार विरोधकांना घाबरून त्यांना दहशतीत घेत आहे, त्यांनी दावा केला की विरोधी पक्षांच्या ४११ आमदारांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवले गेले आहे विरोधकांचा आमदार फोडून त्यांनी अनेक ठिकाणी स्वताची सरकारे स्थापन केली आहेत. हाच प्रयत्न सध्या झारखंडमध्येही सुरू आहे असे ते म्हणाले.