चांदा – नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील ग्रामपंचायतीच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या चौकशी संदर्भात मा.जि.प.सदस्या विजयाताई अंबाडे यांनी रस्तापूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर उपोषण केले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाटेकर यांनी रस्तापूर येथील ग्रामपंचायतमध्ये येऊन ग्रामस्थांसमोर अंबाडे यांना लेखी आश्वासन दिले. चार जानेवारीपर्यंत या सर्व बाबींची चौकशी पूर्ण करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे अंबाडे यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित ठेवले.
रस्तापूर येथील ग्रामपंचायतीची मुख्यमंत्री पेयजल योजना पाच वर्षात कार्यान्वित झाली परंतु पेयजलमधील विहिरीच्या पाण्याचा वापर तत्कालीन लोकनियुक्त सरपंच यांनी आपल्या शेतीसाठी केला. त्या वेळेपासून त्या विहिरीचा पाणी पुरवठा गावाला केला नाही. तरी देखील गावातील नागरिकांना नळ कनेक्शन न देता पाणीपट्टी वसूल करून गोरगरीब जनतेचा पैसा जमवला. ग्रामसेवक व सरपंच यांनी त्या पैशाचा गैरवापर केला, त्या शासकीय विहिरीचे विद्युत कनेक्शन स्वत:च्या शेतीसाठी वापरून त्याचे बिल ग्रामपंचायतीकडून भरून घेतले.
गेल्या पाच वर्षाच्या काळात एकही ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याने गावात घेतली नाही. ग्रामसभा न घेण्याचे कारण काय? ते गुलदस्त्यातच आहे. याबाबत पंचायत समिती नेवासा व जिल्हा परिषद यांना वेळोवेळी लेखी स्वरूपात अर्ज देऊन त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आपण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता, असे अंबडे यांनी या निवेदनात नमूद केले.
या उपोषणाची दखल घेऊन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाटेकर यांनी स्वतः रस्तापूर येथील ग्रामपंचायतमध्ये येऊन ग्रामस्थांसमोर अंबाडे यांना लेखी आश्वासन दिले. चार जानेवारीपर्यंत या सर्व बाबींची चौकशी पूर्ण करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे विजया अंबाडे यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित ठेवले. जर चार जानेवारीपर्यंत चौकशी पूर्ण नाही तर रस्तापूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अंबाडे यांनी दिला.