Telangana – निवडणूक आचार संहितेचे कारण देऊन निवडणूक आयोगाने अडवून ठेवलेली तेलंगणातील शेतकऱ्यांची (farmers) रयथु बंधु योजनेतील निधीची रक्कम जारी करण्याचा आदेश तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ( Revanth Reddy ) यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
रेड्डी यांनी सोमवारी हैदराबाद येथे कृषी विभागाची उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हा आदेश जारी केला. यावेळी बोलताना रेड्डी यांनी स्पष्ट केले की, अधिकाऱ्यांनी सोमवारपासून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करावी.
कोणत्याही शेतकऱ्याची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले. तसेच कॉंग्रेसने दिलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांचे प्रत्येकी दोन लाखांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रियाही राज्य सरकार सुरू करणणार असून त्यासाठीचा आराखडा तयार करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
रयथु बंधु योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दोन पेरणी हंगामाच्यावेळी त्यांना मदत म्हणून थेट आर्थिक रक्कम जारी केली जाते. चालू रबी हंगामासाठी तेलंगणा सरकारने हा निधी जारी करण्याचा आदेश काढला होता,
पण राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने हा निधी वितरीत करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली होती. आता आचारसंहिता संपुष्ठात आली आहे. त्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील बीआरएस सरकारने ही योजना लागू केली होती.