Kerala Governor Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री आपल्याला शारीरिक दुखापत करण्याचा ‘षडयंत्र’ रचत असल्याचा आरोप राज्यपालांनी केला आहे. दिल्लीला जाण्यासाठी तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी शाखा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाला धडक दिली. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या वाहनासमोर काळे झेंडेही दाखवले.
तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपालांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी,”मुख्यमंत्री विजयन यांनीच त्यांना शारीरिक दुखापत करण्यासाठी लोकांना पाठवण्याचा कट रचला होता असा गंभीर आरोप केला. एवढेच नाही तर राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडताना दिसत आहे, असेही खान म्हणाले. पुढे बोलताना आरिफ खान म्हणाले, “जर मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू असेल, तर आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांना परवानगी दिली जाईल का? मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ पोलिस कोणालाही येऊ देणार का? असा सवाल त्यांनी केला. पुढे त्यांनी “आंदोलकांची वाहने येथे उभी होती आणि पोलिसांनी त्यांना त्यांच्या वाहनांमध्ये ढकलले आणि तेथून पळ काढला.” असाही आरोप त्यांनी केला.
#WATCH | SFI workers showed black flags to Kerala Governor Arif Mohammed Khan’s convoy in Thiruvananthapuram, yesterday. https://t.co/5XsdlZ48DK pic.twitter.com/tz3D6Nnm1N
— ANI (@ANI) December 12, 2023
राज्यपाल आरिफ यांनी दावा केला की, “मी स्पष्टपणे सांगत आहे की, मला शारीरिक दुखापत करण्यासाठी मुख्यमंत्रीच कट रचत आहेत आणि या लोकांना पाठवत आहेत. तिरुअनंतपुरमचे रस्ते गुंडांनी ताब्यात घेतले आहेत.” त्यांच्या विरोधात SFI च्या काळ्या झेंड्याच्या निषेधावर आरिफ मोहम्मद खान म्हणाले, “पोलिसांना या बदमाश आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यापासून रोखले गेले आहे. अशा प्रकारची ही पाचवी घटना होती. गाडीवर हल्ला करण्यासाठी त्यांनी काळे झेंडे फडकावले होते त्या काठ्या वापरत होत्या. कारवर खूप ओरखडे आहेत.” असेही त्यांनी म्हटले.
राजभवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफ खान यांना तीन ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले आणि यापैकी दोन ठिकाणी त्याच्या कारला धडक दिली. दुसरीकडे, पोलिसांनी सांगितले की, राज्यपालांचे वाहन एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी एकाच ठिकाणी थांबवले असून विद्यार्थी संघटनेतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेस, त्यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि भारतीय जनता पक्षानेही राज्यपालांवरील हल्ल्यामागे विजयन यांचा हात असल्याचा आरोप केला.