अकोले – आज अनेक राज्यांत भाजप सरकारमुळे नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. त्यांना आधार देण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. भाजप सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम फसवा आहे. भाजपकडून तीर्थक्षेत्राला जास्त निधी देऊन जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम चालू आहे, अशी टीका आ. लहू कानडे यांनी केली.
अकोले तालुका काँग्रेस समितीतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे होते. या वेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते, नानासाहेब रेवाळे, सतीश भांगरे, तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, रमेश जगताप, दादापाटील वाकचौरे, काँग्रेस किसान सभेचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले, संपत कानवडे, अरिफभाई तांबोळी, रामदास धुमाळ, अमोल नाईकवाडी, ज्ञानेश्वर झडे, मीनाक्षी शेंगाळ, मंदाबाई नवले, ॲड. भाऊसाहेब नवले आदी उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले की, आज मीडियाचा प्रभावी वापर होत असून आपल्यालाही युवकांना सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी शिकवावे लागणार आहे. आपल्याला सर्वांना पक्षात काम करण्यास संधी द्यावी लागेल. महिला वर्गाला सन्मान द्यावा लागेल. तेलंगणात काँग्रेस पक्ष विजयी होत असताना दुसरीकडे काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करताना दिसत आहे. राज्यात आपण कोठे कमी पडलो आहे याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.
नवले यांनी, काँग्रेसचा विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी संघटनात्मक कार्यात योगदान द्यावे, असे सांगितले.
रुपवते यांनी, राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी दरमहा एक दिवस बैठक आयोजित केली जाणार आहे. असे सांगितले. या वेळी वाकचौरे, मीनानाथ पांडे, ज्ञानेश्वर झडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी निवडीचे वाचन तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे यांनी केले. त्याचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश पाचपुते यांनी केले. आभार फैजान तांबोळी यांनी मानले.
माजी आ. तांबेंचे निलंबन मागे घ्यावे
माजी आ. डॉ. सुधीर तांबे हे अजूनही काँग्रेसचे काम करीत आहेत. त्यांची काँग्रेस पक्षाला गरज आहे. काँग्रेस पक्षाने त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात सन्मानाने घ्यावे, असा ठराव उत्कर्षा रुपवते यांनी मांडला. त्यास सोन्याबापू वाकचौरे यांनी अनुमोदन देऊन ठराव पास करण्यात आला.