कोपरगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जादुई करिश्मा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उत्कृष्ट नियोजन आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. भाजपच्या या ऐतिहासिक विजयामुळे पंतप्रधान मोदी यांच्या कुशल नेतृत्वावर पुन्हा एकदा पसंतीची मोहोर उमटवून देशाला मोदी व भाजपशिवाय पर्याय नसल्याचे दाखवून दिले आहे, असे माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल कोपरगाव येथे शहर व तालुका भाजपतर्फे माजी आ. कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर फटाके वाजवून व लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली.
या वेळी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, महावीर दगडे, नरेंद्र डंबीर, गोपीनाथ गायकवाड, राजेंद्र बागुल, दादासाहेब नाईकवाडे विजय चव्हाणके, जयप्रकाश आव्हाड, जयेश बडवे, खलिकभाई कुरेशी, फकिर मोहम्मद पैलवान, इलियासभाई खाटीक, रहीम शेख, सतीश नरोडे, शंकर बिऱ्हाडे, किरण सुपेकर, दत्ता कोळपकर, सलीम पठाण, रोहन दरपेल, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, रवींद्र लचुरे, सोमनाथ ताकवले, सुजल चंदनशिव, प्रभुदास पाखरे, संजय खरोटे आदी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाल्या की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जो अभूतपूर्व विजय मिळणार आहे त्याची ही सुरुवात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत विकसित भारताचे ध्येय घेऊन जागतिक महासत्ता होण्याकडे यशस्वी वाटचाल करत आहे.
विरोधकांची बोलती बंद!
विरोधक म्हणत होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा संपला असून, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजप पराभूत होईल; पण शेवटी जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या निवडणुकांमध्ये भाजपला साथ देऊन मोदी यांचे हात बळकट केले आहेत. मोदींची बदनामी करणाऱ्या विरोधकांची बोलती बंद केल्याचे माजी आ. कोल्हे म्हणाल्या.