नगर – आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते, नागरिक देखील स्वच्छतेसाठी शपथ घेतात खरे, पण प्रत्यक्षात स्वच्छता राखत नसल्याने स्वच्छतेची शपथ नावालाच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच या प्लास्टिक व कचऱ्याच्या साम्राज्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.
केडगाव रेल्वे स्टेशन पुणे महामार्ग जवळ फटाके व्यवसायिकांनी दिवाळी सणानिमित्त दुकाने थाटली होती. दहा ते पंधरा दिवस फटाका मार्केटमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात फटाके खरेदी केले. फटाके विक्रेत्यांनी आपला व्यवसाय संपल्यानंतर मैदानावरील कचरा, प्लास्टिक गोळा करणे गरजेचे होते.
मात्र सर्वत्र प्लास्टिक पसरले असून त्यातून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे शहराच्या विद्रूपीकरणांमध्ये भर पडत आहे. फटाके व्यवसायिकांनी स्वच्छतेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. कचरा, प्लास्टिक साफ करण्याची कोणतीही तसदी व्यावसायीकांनी घेतली नाही. कचरा, प्लास्टिक तेथेच पडून राहिल्याने परिसरातील कॉलनीत वाऱ्यामुळे उडून जात असून या कचऱ्याचा नाहक त्रास येथील रहिवासी नागरिकांना होत आहे.
उपमहापौरांकडून नाराजी
जगासमोर पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्वच्छता ठेवणे पर्यावरणाची हानी टाळणे हे काम फक्त प्रशासनाचेच नसून तर प्रत्येक नागरिकाची आहे. केडगाव रेल्वे स्टेशन पुणे महामार्ग जवळ फटाके व्यवसायिकांकडून अस्वच्छतेचे प्रदर्शन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले ही अत्यंत गंभीर समस्या आहे. व्यवसाय संपल्यानंतर व्यावसायिकांनी स्वच्छतेबाबत आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे होते, असे सांगत येथील प्लास्टिक कचरा पाहून उपमहापौर भोसले यांनी नाराजी व्यक्त केली.