Mehbooba Mufti – जम्मू-काश्मीरमधील स्थिती सुरळित असल्याच्या केंद्र सरकारच्या दाव्यावर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थिती सुधारली असल्यास प्रत्यक्षात तसे दिसायला हवे, असे त्यांनी म्हटले.
केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या दाव्याविषयीचा प्रश्न मेहबुबा यांना पत्रकारांनी पुलवामा जिल्ह्यात विचारला. लोक बोलू शकत नाहीत. पत्रकारांना त्यांचे कार्य करता येत नाही. तुरूंग भरले आहेत. सर्व सुरळित असेल तर काश्मिरींची धास्ती का वाटते? लोकांची छळवणूक का केली जात आहे.
दर दिवशी ईडी, एनआयएच्या छाप्यांचा दबाव कशासाठी? सुरक्षा दलांसाठी आधी तंबूंची व्यवस्था असायची. आता कायमस्वरूपी बांधकामांची व्यवस्था केली जात आहे, असेही त्या उत्तरादाखल म्हणाल्या.
जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री लाल सिंह यांना नुकतीच ईडीने अटक केली. त्या कारवाईविषयीच्या प्रश्नावर त्या उत्तरल्या, भाजपविरोधात बोलणाऱ्यांवर केंद्रीय यंत्रणा छापे टाकतात.
आज ईडी ही यंत्रणा भाजपचा विभाग बनली आहे. भाजपकडून आधी एखाद्या व्यक्तीचा उल्लेख भ्रष्ट म्हणून केला जातो. मात्र, त्या व्यक्तीने भाजपमध्ये प्रवेश केल्यास सगळे ठीकठाक होते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.