सातारा – पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वरची असलेली जागतिक ओळख कायम ठेवण्यासाठी या परिसरात एकही अनधिकृत बांधकाम यापुढे होऊ दिले जाणार नाही. बेकायदा बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरुच राहणार असून कोणाच्याही दबावाखाली कोणीही काम करत नाही.
महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असून यामध्ये कोणीही काहीही बेकायदेशीर व चुकीचे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात मतदार नोंदणी जनजागृतीच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेनंतर श्री. डुडी पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे आदी उपस्थित होते. जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर येथे इको सेन्सेटिव्ह झोन असल्यामुळे येथील बांधकामांबाबत अनेक निकष, नियम आहेत.
मात्र, गेल्या काही वर्षात अनेकांनी नियम डावलून बेकायदा बांधकामे केली आहेत. त्यामुळे या परिसरातील निसर्गसंपदेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बांधकामे करताना शासनाने घालून दिलेले निकष न पाळल्याने मोठे नुकसान होत आहे. या परिसरात बरीच अनधिकृत बांधकामे असल्याच्या तक्रारी असून त्याअनुषंगाने प्रशासनाने माहिती घेतली आहे.
यापूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईची मोहीम सुरु असून यापुढे नव्याने बेकायदा बांधकामे होऊ नयेत यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे श्री. डुडी यांनी स्पष्ट केले. महाबळेश्वर येथे सुरु करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेसंदर्भात श्री. डुडी म्हणाले, “”संबंधितांना प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. काल काही अतिक्रमणे काढली असून काही अतिक्रमणधारकांनी 15 दिवसांत स्वत:हून अतिक्रमणे काढण्याची तयारी दर्शवली होती. 15 दिवसांत संबंधितांनी अतिक्रमणे न काढल्यास प्रशासन काढून टाकणार आहे. बांधकामे करताना नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असून अनधिकृत बांधकाम कोणाचे आहे हे न पाहता कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
स्थानिकांनी घाबरु नये
नियम वगळून, नियम डावलून काहीही होणार नाही. या मोहिमेदरम्यान स्वत:च्या लाभाचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. एकही अनधिकृत बांधकाम नव्याने उभे राहू नये अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये स्थानिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. बाहेरुन येऊन याठिकाणी बरीच अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली असून स्थानिकांनी याबाबत घाबरुन जाऊ नये, असेही श्री. डुडी यांनी स्पष्ट केले.