जळोची – शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांना बारामती ॲग्रो कंपनी संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र या प्रश्नावर शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिला आहे. ‘मी त्यावर उत्तर देऊ इच्छित नाही’, असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. त्यामुळे शरद पवार हे या कारवाईच्या संदर्भात कठोर भूमिका घेतील असं दिसत होतं. परंतु, तसं न करता त्यांनी यावर न बोलणं पसंत केलं आहे. शरद पवार हे यावर काय भूमिका घेतात हे देखील आगामी काळात पाहायला मिळेलच.
यावेळी शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील पत्रकार हे प्रामाणिक आहेत त्यांच्यावर अशा प्रकारची टिप्पणी करणे योग्य नाही. पत्रकारांनी महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा केली नव्हती. चहा आणि धाब्यावर जाण्यासारखं पत्रकारांचं महाराष्ट्रात चित्र नाही.”
पुढे शरद पवार म्हणाले, “मराठा समाजाच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी ते आंदोलन, उपोषण करत आहेत. राज्य सरकारने त्यांना शब्द दिलेला आहे की आम्ही त्यांचा प्रश्न सोडवू, ओबीसींना वाटतं की त्यांच्यातील आरक्षण इतर कोणी घेऊन नये याची नोंद राज्य सरकारला घ्यावी लागेल. याबाबत ही काही निर्णय घेऊ असा विश्वास केंद्र सरकारने दिला आहे. मराठा समाजाला ही आश्वासनं दिली आहेत नक्की यावरून राज्य सरकार काय निर्णय घेत हे 30 – 35 दिवसात कळेल. त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. अन्यथा काय होईल हे आज सांगता येणार नाही.”