मुंबई – आशिया करंडक स्पर्धेसाठी संघ निवड जाहीर झाल्यावर शिखर धवनच्या नावाचा विचार झाला नाही, असे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितले. त्यांच्या या उत्तरामुळे धवनसाठी भारतीय संघाचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचेच संकेत मिळत आहेत.
बीसीसीआयच्या निवड समितीने सोमवारी भारतीय संघाची निवड केली.
त्यात धवनला संधी दिली गेली नाही. त्यावर आगरकर यांनी जे उत्तर दिले, तसेच उत्तर त्यांनी यजुवेंद्र चहलबाबत दिले. लोकेश राहुलला बॅकअप म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली. मात्र, सध्या सलामीवीर म्हणून कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल व ईशान किशऩ असे भक्कम पर्याय आमच्याकडे आहेत, असे सांगताना महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडच्याही नावाचा विचार झाला नाही, हेदेखील सांगितले.
धवन आता 38 वर्षांचा असून, त्याने भारताकडून अखेरचा सामना 10 डिसेंबर 2022 साली बांगलादेशविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो एकदिवसीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही.
चहल व अश्विनकडेही कानाडोळा
संघात अक्सर पटेल, कुलदीप यादव व रवींद्र जडेजा असे तीन सक्षम पर्याय असताना यजुवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांना सामावून घेणे शक्यच नव्हते, असेही आगरकर यांनी म्हटले आहे. ए
कदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत आशिया करंडक स्पर्धेसाठी संघ निवड करण्यात आली आहे. त्यात आता चहल व अश्विन हे निवड समिती तसेच कर्णधार व संघ व्यवस्थापनाच्या योजनेचा भागच नाहीत, हेदेखील स्पष्ट झाले आहे.
राहुलबाबत धक्कादायक वक्तव्य
सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल याची निवड करताना तो अद्याप पूर्ण तंदुरुस्त आहे का नाही हे सध्या सांगणे शक्य नाही, असे धक्कादायक विधान आगरकर यांनी केले. त्याला नव्याने छोटी दुखापत झाली असून, तो स्पर्धेपूर्वी पूर्ण बरा होईल, असेही ते म्हणाले.
त्याच्या जुन्या दुखापतीचा या नव्या दुखापतीशी काहीही संबंध नाही हे लक्षात आल्यावर आम्ही पर्याय म्हणून संजू सॅमसनला बॅकअप म्हणून निवडल्याचेही आगरकर म्हणाले. मात्र, यातून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी (एनसीए) बीसीसीआय व निवड समितीचा सुसंवाद नसल्याचेच समोर येत आहे.