मुंबई – खासदार संजय राऊत यांनी आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. यामध्ये ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु होत्या त्यावर देखील उद्धव ठाकरेंनी भाष्य केले.
मणिपूरमध्ये आज जे मारले जाताहेत ते हिंदू नाहीत का ? ते या देशाचे नागरिक नाहीत का ? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विचारला. कोविड काळात राबवलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजना आता ‘माझा देश माझी जबादारी’ म्हणून राबवण्याची गरज आहे असं देखील ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.तसेच राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत देखील उद्धव यांनी यावेळी आपलं परखड मत मांडल.
मनसे सोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चांना आधार असता, तर माध्यमांमधील चर्चा थांबली नसती. चर्चा झाली आणि चर्चा थांबली. ज्याने चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्याला आधार मिळाला नाही, त्यामुळे ती चर्चा थांबली असेल.” तसेच त्यांच्यासोबतच्या युतीचा प्रस्ताव आला तर असा सवाल राऊत यांनी विचारला असता ठाकरे म्हणाले,”मी प्रस्ताव आला तर, गेला तर यावर विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो. त्यामुळे आत्ता तरी तशी काही चर्चा नाही. त्यामुळे त्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही” असं ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भाजपवर टीका
बाबरीच्या वेळी जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार नव्हता.. राम मंदिराचा निणर्य तुम्ही घेतला नाही मग मंदिराचे श्रेय तुम्ही कसे घेऊ शकता. मग हिंदुत्वासाठी तुम्ही केलत काय आणि कुठंय तुमचं हिंदुत्व अशी टीका देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपवर केली.