नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत 1978 नंतर 45 वर्षांत प्रथमच यमुना नदीने विक्रमी पाणीपातळी गाठली आहे. दिल्लीतील सखल भाग पुराच्या पाण्यात बुडाला आहे. त्याचबरोबर रहिवासी भागातही पाणी तुंबले असून, रस्त्यांवर पाणी साचण्याची स्थिती आहे. शहरातील सर्व बाजारपेठांमध्येही पाणी तुंबले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही लिहिले असून राजधानीत होणाऱ्या जी-20 परिषदेचा हवाला दिला आहे.
केजरीवालांनी आपल्या पत्रात लिहिले, “आज (बुधवार) दुपारी 1 वाजता दिल्लीतील यमुनेची पातळी 207.55 मीटरवर पोहोचली आहे. ते धोक्याच्या चिन्हाच्या (205.33 मीटर) वर आहे. याआधी 1978 मध्ये यमुनेची कमाल पातळी 207.49 मीटर होती. त्यावेळी दिल्लीत पूर आला होता आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. आता 207.55 मीटरच्या पातळीवर यमुनेत कधीही पूर येऊ शकतो.’
त्यांनी पुढे लिहिले की, केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अंदाजानुसार यमुनेची पातळी बुधवारी रात्री 207.72 मीटरपर्यंत पोहोचेल, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ही वाढ हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे होत आहे. त्यामुळे शक्य असल्यास हथिनीकुंड बॅरेजचे पाणी मर्यादित वेगाने सोडावे, जेणेकरून दिल्लीतील यमुनेची पातळी आणखी वाढणार नाही, अशी विनंतीही केजरीवालांनी पत्रात केली आहे.
जगात चांगला संदेश जाणार नाही’
जी-20 शिखर परिषदेचा दाखला देत केजरीवालांनी पत्रात म्हटले की, “दिल्ली ही देशाची राजधानी आहे. आणि काही आठवड्यात येथे जी- 20 शिखर परिषद होणार आहे. देशाच्या राजधानीत आलेल्या पुराच्या बातम्यांनी जगाला चांगला संदेश जाणार नाही. आपण सर्वांनी मिळून दिल्लीच्या जनतेला या परिस्थितीतून वाचवायला हवे.’ दरम्यान, काश्मिरी गेटच्या मोनस्ती मार्केट, रिंगरोड, यमुना घाट, यमुना बाजार परिसरात पुराचे पाणी पोहोचले आहे. तसेच, यमुनेचे पाणी कश्मिरी गेट येथील गोशाळेत दाखल झाले आहे. आयटीओ येथील छठ घाट पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे नदीलगतचा परिसर अतिशय संवेदनशील बनला आहे. या भागात सुमारे 41 हजार लोक राहतात.
असा मोडला होता ‘यमुने’ने विक्रम
1978 मध्ये शहरातील अनेक भाग पुरात पूर्णपणे बुडाले होते. हरियाणातून येणारे पाणी हे त्याचे प्रमुख कारण होते. त्यानंतर अचानक 2 लाख 24 हजार 390 क्युसेक पाणी यमुनेत आले. त्यावेळी लोखंडी पुलावरील यमुनेची पातळी 207.49 मीटरपर्यंत पोहोचली होती. यमुनेची पातळी इथपर्यंत गेल्याची ही पहिली आणि शेवटची वेळ होती. मात्र, त्यानंतर यमुनेच्या पातळीने आणखी दोनदा 207 मीटरचा टप्पा ओलांडला होता. त्या वेळा 2010 (207.11 मी) आणि 2013 (207.32 मी) होत्या. 2010 मध्ये यमुनेमध्ये 2 लाख 26 हजार 535 क्युसेक पाण्याची आवक झाली होती, तर 2013 मध्ये 3 लाख 65 हजार 573 क्युसेक पाण्याची आवक झाली होती.