नवी दिल्ली – गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला असून गेल्या 30 तासांत 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर राज्यात दोन दिवसांत विविध घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
पंचमहाल जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला असून आणंदमध्ये दोन जणांनी आपला जीव गमाविला आहे. याशिवाय जामनगर आणि अरवली जिल्ह्यात दोन पुरुष, तर अमरेली जिल्ह्यात एका महिलेचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तसेच जुनागढ, जामनगर, मोरबी, कच्छ, सुरत आणि तापी जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यत राज्यातील 37 तालुक्यांमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यात तब्बल 299 मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.