नवी दिल्ली – देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना कसोटी संघात स्थान मिळवण्याचे ध्येय प्रत्येक क्रिकेटपटूचे असते. हेच ध्येय ठेवून यजुवेंद्र चहलही क्रिकेटकडे वळला होता. मात्र, सात वर्षे आंतरराष्ट्रीय टी-20 व एकदिवसीय सामने खेळल्यावरही त्याला अद्याप कसोटी संघात स्थान मिळवता आलेले नाही. त्यामुळे येत्या काळात भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याचेच ध्येय असल्याचे त्याने व्यक्त केले आहे.
चहल हा गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज ठरला आहे. आयपीएल स्पर्धेतही ते सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. 2016 साली कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून चहलने 72 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 121 बळी मिळवले आहेत.
त्याने 75 टी20 मध्ये 91 गडी बाद केले आहेत. मात्र, त्याला आतापर्यंत भारतासाठी एकही कसोटी सामना खेळता आलेला नाही. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्सर पटेल आणि कुलदीप यादव यांची भारतीय संघात निवड झाली असून त्यांनी काही कसोटी सामने खेळले आहेत.
प्रत्येकजण आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहतो. माझे स्वप्न देखील असेच काहीसे आहे. मी टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खूप काही साध्य केले आहे पण कसोटी क्रिकेट अजूनही माझ्यासाठी स्वप्नच बनून राहिले आहे. माझ्या नावासमोर कसोटी क्रिकेटपटू हे बिरूद लावण्याची वाट पाहत आहे. मात्र, मला आशा आहे की लवकरच मला भारतीय कसोटी संघात खेळण्याची संधी मिळेल, असे चहल म्हणाला.
चहलने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अद्याप भारताकडून एकही सामना खेळलेला नाही आणि तेही स्वप्न पूर्ण करायचे आहे. मी खेळत आहे तोपर्यंत माझे सर्वोत्तम देणे आणि चांगली कामगिरी करत राहणे यावर माझे लक्ष असते. कोणताही सामना असो, माझ्या क्षमतेपेक्षा जास्त सरस खेळ करणे हाच माझा हेतू असतो. संघातील निवड ही अशी गोष्ट आहे जी आपल्या हातात नसते, असेही त्याने सांगितले.